अन्नदात्याला चिरडण्याचा प्रयत्न

Homeताज्या बातम्यासंपादकीय

अन्नदात्याला चिरडण्याचा प्रयत्न

देशभरात कृषी कायद्याच्या विरोधात शेतकर्‍यांनी उग्र आंदोलन सुरू केले आहे. हे आंदोलन काही एक-दोन दिवसांपासून सुरू नाही, तर या आंदोलनाला दहा पेक्षा अधिक

पंतजलीचा दावा आणि भूल
मनच सर्व गुणांचे उगमस्थान
राजकारणांतील महिलांचे स्थान


देशभरात कृषी कायद्याच्या विरोधात शेतकर्‍यांनी उग्र आंदोलन सुरू केले आहे. हे आंदोलन काही एक-दोन दिवसांपासून सुरू नाही, तर या आंदोलनाला दहा पेक्षा अधिक महिन्यांचा कालावधी उलटला आहे, तरी देखील या आंदोलनाची धग कमी झालेली नाही. शेतकरी दिवसेंदिवस आक्रमक होत असून, कृषी कायदे मागे घेण्याची मागणी केली जात आहे. शेतकरी जरी आक्रमक असला तरी, त्यांनी दहा महिन्यात कधीही हिंसाचारांचा अवलंब केला नाही. मात्र काल उत्तरप्रदेशात पुन्हा एकदा शेतकर्‍यांविषयी बेबंदशाही दिसून आली.

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यात केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाच्या कारखाली दोन शेतकरी चिरडून मरण पावण्याची घटना रविवारी घडली. या नंतर झालेल्या हिंसाचारात 8 जण ठार तर शेकडो जखमी झाले. संतप्त जमावाने काही गाड्या पेटवून दिल्या. मृतांमध्ये 4 शेतकरी असल्याचे उ. प्रदेश सरकारने सांगितले. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या चिरंजीवाने अत्यंत बेजबाबदारपणा दाखवत शेतकर्‍यांना चिरडले. शेतकरी हा अन्नदाता आहे. त्याने पिकवलेल्या अन्नातूनच आपण जगतो आहेत, त्याच्याप्रती इतका कू्ररपणा दाखवण्याची हिमंत केवळ सत्तेच्या अहंकारातून निर्माण होते. उत्तरप्रदेशात शेतकर्‍यांना चिरडण्याचा हा प्रयत्नामुळे देशभरातील शेतकरी पुन्हा एकवटण्याची चिन्हे आहेत. आणि त्याचा मोठा परिणाम आगामी उत्तरप्रदेशातील निवडणुकांमध्ये बघायला मिळू शकतो. रविवारी लखीमपूर खेरी जिल्ह्यातील तिकुनिया येथे मोदी सरकारच्या तीन वादग्रस्त शेती कायद्याचा विरोध म्हणून शेतकर्यांचे आंदोलन सुरू होते. या गावात उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य व केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या उपस्थितीत एका सरकारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तिकुनिया हे मिश्रा यांच्या वडिलांचे गाव व त्यांचा लोकसभा मतदार संघ आहे.

केशव प्रसाद मौर्य यांच्या मोटारींचा ताफा रस्त्यावरून निघाला तेव्हा रस्त्याच्या दोन्ही बाजूला आंदोलकांनी निदर्शने सुरू केली. ताफा थांबवण्याचा काहींचा प्रयत्न होता. आंदोलकांच्या हाती काळे झेंडेही होते. या दरम्यान मौर्य यांच्या ताफ्यातल्या तीन गाड्या आंदोलकांच्या अंगावर गेल्या. त्यातील एक गाडी मिश्रा यांच्या मुलाची आशिष मिश्रा यांची व नातेवाइकांची होती. या दुर्घटनेत एका शेतकर्‍यांचा जागीच मृत्यू झाला व तर अन्य एकाचा इस्पितळात मृत्यू झाला. 8 जखमींना तातडीने इस्पितळात नेण्यात आले. जखमींमध्ये संयुक्त किसान मोर्चाचे एक नेते तेजिंदर एस. विरक होते. मंत्र्याच्या मुलाच्या गाडीखाली चिरडून शेतकरी मरण पावल्याची बातमी कळल्यानंतर शेतकरी संतप्त झाले आणि त्यांच्याकडून व काही गाड्यांना आगी लावण्यात आल्या. शेतकर्‍यांचे आंदोलन थोपवता आले नाही, म्हणून आता शेतकर्‍यांनाच चिरडून टाकले. या नरसंहारावर जी लोक मूग गिळून गप्प बसलीत, त्यांनी या कालचक्राचा फेरा कायम स्मरणात ठेवावा, त्यांनाही अशाच प्रकारे एक दिवस निशाण्यावर घेतले जाईल.

या प्रकरणाला सरळपणे पंतप्रधान मोदी आणि उत्तर प्रदेशचे गृह राज्यमंत्री अजय मिश्र टोनी जबाबदार आहेत, या शब्दांत युथ काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी. वी. यांनी हल्लाबोल केला. शेवटी तेच झाले जे वाटत होते, महात्मा गांधींच्या लोकशाही देशात गोडसेंच्या भक्तांनी, मोठ्या पावसात आणि पोलिसांशी संघर्ष करत शेतकर्‍यांच्या भेटीस निघालेल्या आमच्या नेत्या प्रियंका गांधी यांना हरगाव येथून अटक केली, असेही श्रीनिवास यांनी म्हटले आहे. श्रीनिवास यांच्या या ट्विटमुळे खळबळ उडाली आहे.
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने केलेल्या तीन नव्या कृषी कायद्याविरोधात पंजाब, उत्तर प्रदेश, हरियाना, राजस्थान राज्यातील शेतकरी आंदोलन करीत आहेत. त्यावर आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांचा मार्ग रोखण्याचा प्रयत्न झाला होता. देशभरातल्या शेतकर्‍यांच्या मतांचा विचार न करता, त्यांना विश्‍वासात न घेता, न जुमानता मोदी सरकारने विधेयके मंजूर केली. या कायद्यामुळे करार शेतीच्या माध्यमातून बडे भांडवलदार शेती व्यवस्थेत उतरतील आणि जमिनीच्या तुकड्यावर श्रम करीत गुजराण करणार्‍या शेतकर्‍यांना हद्दपार करतील अशी भीती शेतकर्‍यांच्या मनात आहे.

कोरडवाहू आणि आर्थिकदृष्ट्या दुबळ्या असलेल्या शेतकर्‍यांना शेतमालाच्या हमीभावाचे जे कवच आहे ते गळून पडेल अशी शेतकर्‍यांची भावना आहे. त्याकडे साफ दुर्लक्ष करून सत्तेच्या बळावर शेतकर्‍यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करणे हे केवळ अमानुषच नव्हे तर निषेधार्ह आहे. गेल्या दोन-अडीच महिन्यापासून शेतकर्‍यांचा असंतोष खदखदत असताना त्यांच्याशी संवाद करण्याचे दायित्वसुद्धा हे सरकार पार पाडत नाही, हीच या शेतकरी आंदोलनाची शोकांतिका म्हणावी लागेल. 

COMMENTS