पारनेर : तालुक्याच्या उत्तर भागातील पळशी, खडकवाडी, कामटवाडी, वारणवाडी आणि वनकुटे या संपूर्ण परिसराला वादळी वारा आणि गारपिटीने झोडपून काढले आहे. य

पारनेर : तालुक्याच्या उत्तर भागातील पळशी, खडकवाडी, कामटवाडी, वारणवाडी आणि वनकुटे या संपूर्ण परिसराला वादळी वारा आणि गारपिटीने झोडपून काढले आहे. या नैसर्गिक आपत्तीत टोमॅटो आणि आंबा बागा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या असून, घरे कोसळल्याने अनेक आदिवासी कुटुंबे उघड्यावर आली आहेत. तसेच ५० पेक्षा जास्त विजेचे खांब कोसळल्याने परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला असून शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.
या भागात मोठ्या प्रमाणावर टोमॅटोच्या बागा आहेत. मात्र, वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार गारपिटीमुळे या बागा जमिनीदोस्त झाल्या आहेत. हातातोंडाशी आलेला घास ऐनवेळी हिरावला गेल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. टोमॅटोपाठोपाठ आंब्याच्या फळबागांनाही या वादळाचा मोठा फटका बसला असून कैऱ्यांचा सडा जमिनीवर पडला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे भांडवल वाया गेले आहे.
पळशी येथील गांगड वस्ती आणि काळे वस्ती भागात वादळाने रौद्र रूप धारण केले होते. या भागातील अनेक गरिबांची व आदिवासी बांधवांची घरे कोसळली असून काहींच्या घरांचे पत्रे हवेत उडून गेले आहेत. वादळाचा वेग एवढा प्रचंड होता की, महावितरणचे ५० पेक्षा जास्त विजेचे खांब कोसळल्याने संपूर्ण परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.
पंचनामे करून नुकसानभरपाई द्या वादळी पाऊस आणि गारपिटीने पळशी व खडकवाडी परिसरातील शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. शासनाने अजिबात वेळ न दवडता या संपूर्ण भागाचे तातडीने पंचनामे करावेत आणि पीडित शेतकऱ्यांना तसेच ग्रामस्थांना तातडीने शासकीय नुकसान भरपाई देऊन आधार द्यावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

COMMENTS