…तर, नवनीत राणांनी महिला आयोगाकडे तक्रार करावी : रुपवते राज्य महिला आयोगाच्या सदस्य दीपिका चव्हाण व उत्कर्षा रुपवते यांनी गुरुवारी नगरला भेट देऊन महिला व बालकल्याण विभागाचा आढावा घेतला.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

…तर, नवनीत राणांनी महिला आयोगाकडे तक्रार करावी : रुपवते

अहमदनगर/प्रतिनिधी : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना स्वतःवर अन्याय झाल्यासारखे वाटत असेल तर त्यांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार करावी, असे स्पष्ट

LokNews24 l आदिवासी दाम्पत्याला महिला सावकराकडून मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल
पाणी सोडत नाही, तोपर्यंत उपोषण सोडणार नाही
वरखेड यात्रेनिमित्त तहसील कार्यालयात नियोजन बैठक उत्साहात

अहमदनगर/प्रतिनिधी : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना स्वतःवर अन्याय झाल्यासारखे वाटत असेल तर त्यांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार करावी, असे स्पष्ट प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या सदस्य उत्कर्षा रुपवते यांनी गुरुवारी येथे केले. यावेळी त्यांच्यासमवेत आयोगाच्या दुसर्‍या सदस्या व सटाण्याच्या माजी आमदार दीपिका चव्हाण उपस्थित होत्या.
मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा म्हणण्याचा प्रयत्न खा. नवनीत राणा व आ. रवी राणा यांनी केला होता. त्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबद्दल अवमानजनक भाष्य केल्याने त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्य महिला आयोगाच्या भूमिकेबद्दल सदस्या रुपवते यांना विचारले असता, हा विषय खूप मोठा आहे. त्यांनी ट्वीट केले आहे, लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार केली आहे, बरेचसे व्हीडीओही आहेत. पण असे असतानाही एक महिला म्हणून त्यांना जर स्वतःवर अन्याय झाल्याचे वाटत असेल तर त्यांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल करावी. ज्या महिला त्यांच्यावर अन्याय झाला म्हणून आयोगाकडे तक्रार दाखल करतात, त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न महिला आयोग करतो. त्यामुळे खा. राणा यांनाही त्यांच्यावर अन्याय झाल्याचे त्यांना वाटत असेल तर त्यांनीही तक्रार दाखल करावी, त्याची दखल आयोग घेईल, असे स्पष्ट भाष्य रुपवते यांनी केले.

ऑगस्टमध्ये पिंक बॉक्स उपक्रम
शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थिनींना छेडछाड, लैंगिक छळ, फसवणूक वा अन्य कोणत्याही तक्रारी करण्यासाठी प्रत्येक शाळा-महाविद्यालयात पिंक बॉक्स ठेवला जाणार आहे. त्यात विद्यार्थिनी स्वतःच्या नावानिशी वा नावाविना तक्रार देऊ शकतात. या उपक्रमाचा आराखडा तयार केला जात असून, येत्या ऑगस्टपासून तो राज्यात सुरू होईल, असे स्पष्ट करून रुपवते म्हणाल्या, ज्या गावात बालविवाह होतील, त्या गावातील सरपंच व ग्रामसेवकाचे पद रद्द करण्याची शिफारस राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी शासनास केली आहे. याशिवाय गावस्तरावर अंगणवाडी सेविकेद्वारे बालविवाहाचे दुष्परिणाम यावर ग्रामस्थांची समुपदेशन मोहीम राबवली जाणार आहे. सोशल मिडियाद्वारे मुलींच्या फसवणुकीचे प्रकार होत असल्याने मुले व मुलींसाठी संवाद उपक्रम आयोगाद्वारे घेतले जाणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, शासकीय-निमशासकीय कार्यालयांतून होणारे महिलांवरील अन्याय रोखण्यासाठीच्या अंतर्गत तक्रार समित्या जिल्ह्यात शासकीय स्तरावर 273 व निमशासकीय स्तरावर 867 तसेच खासगी स्तरावर 731पैकी 630 ठिकाणी झाल्या आहेत. भविष्यात या प्रत्येक समितीच्या कामाचा आढावा घेण्याचे नियोजन आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सिव्हीलमध्ये धूळ होती…
रुपवते व चव्हाण यांनी महिला व बालकल्याण विभागाचा आढावा घेतल्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयातील प्रसुतीगृह कक्षाची पाहणी केली व तेथील बाथरुमही पाहिले आणि महिलांशी संवादही साधला. आयोगाच्या सदस्य येणार म्हणून कोणतीही विशेष स्वच्छता केल्यासारखे दिसले नाही. तेथे स्वच्छता होती व धूळही होती. तेथे कर्मचारी व आवश्यक सुविधा कमी जाणवल्या. मात्र, तेथे रुग्णांची संख्याही अपेक्षेपेक्षा जास्त दिसत होती, असेही रुपवते यांनी आवर्जून सांगितले.

COMMENTS