Homeताज्या बातम्यासंपादकीय

शह-प्रतिशह !  

 महाराष्ट्राच्या राजकारणात सहा महिन्यांपूर्वी झालेला (केलेला) उलटफेर पाहता देशातील भाजपेतर पक्षांची सत्ता असणाऱ्या राज्यांना एकेक करून आता निपटण्

ओबीसींची संधी डावलण्यासाठी मराठा नेत्यांचे पक्षांतर ! 
पोप बेनेडिक्ट १६ यांच्या स्मृतीत !  
जेव्हा कायदाच दुर्लक्षित केला जातो……! 

 महाराष्ट्राच्या राजकारणात सहा महिन्यांपूर्वी झालेला (केलेला) उलटफेर पाहता देशातील भाजपेतर पक्षांची सत्ता असणाऱ्या राज्यांना एकेक करून आता निपटण्याचा विचार केंद्रीय भाजपाचा आणि सरकारचा दिसतो. याचा परिणाम बिहारमध्ये नुकतेच नितीशकुमार यांच्या जेडीयू पक्षातून बाहेर पडलेले उपेन्द्र कुशवाह यांनी आता स्वतंत्र पक्ष म्हणून ‘राष्ट्रीय लोक जनता दल’ स्थापन केला आहे. राजद आणि जेडीयू अशा दोन्ही पक्षांच्या नावाच्या मिश्रणातून नव्या पक्षाचे नाव बनवले असल्याचे सकृतदर्शनी स्पष्ट होते. राजकारणात नेहमीच महत्वाकांक्षा असते. महत्त्वाकांक्षा नसलेली व्यक्ती राजकारणात फार टिकत नाही, हे देखील तेवढेच सत्य. राजकारणात महत्वाकांक्षा हे दुधारी शस्त्र असते. सामान्य जीवनातून व्हीआयपी पर्यंत पोहचविणाऱ्या राजकारणात नेहमीच पुढच्या पदाची आस धरली जाते. आस ही महत्वाकांक्षेचे रूप घेते तेव्हा अनेकार्थाने ती राजकीय व्यक्ती आपल्या शक्तीला न ओळखता वर जाण्याचा प्रयत्न करते.

त्यात ती व्यक्ती स्वतःच्या कर्तृत्वाने पुढे जाऊ शकते अथवा काहींची मदत घेऊन. जे मदत घेऊन पुढे जाता ते राजकारणात औटघटकेचे सत्ताधारी बनतात. ही बाब भारताच्या राजकीय इतिहासात तीन वेळा सिध्द झाली आहे. मोरारजी देसाई यांचे सरकार कोसळल्यानंतर चरणसिंग चौधरी यांनी पंतप्रधान पदाची महत्वाकांक्षा धरली. त्यांच्या मदतीला इंदिरा गांधी यांनी काॅंग्रेसचा पाठिंबा देऊन त्यांची महत्त्वाकांक्षा पूर्ण केली; परंतु, अवघ्या चार महिन्यात त्यांना राजीनामा द्यावा लागला. हीच गत दुसऱ्यांदा व्ही पी. सिंग यांचे सरकार कोसळल्यानंतर चंद्रशेखर यांच्या बाबतीत घडली. राजीव गांधी यांच्या नेतृत्वातील काँग्रेसने चंद्रशेखर यांना पाठिंबा देऊन त्यांची महत्त्वाकांक्षा पूर्ण केली. परंतु, अवघ्या चार महिन्यात त्यांना पाय‌उतार व्हावे लागले. एच. डी. देवेगौडा यांचे सरकार कोसळल्यानंतर इंद्रकुमार गुजराल यांचीही तीच गत झाली. या ऐतिहासिक संदर्भांचा याठिकाणी उल्लेख करण्याचे कारण असे की, स्वतंत्र कुवत आणि क्षमता नसेल आणि राजकीय सत्तेतील वरच्या पदाची अपेक्षा धरली तर काय गत होते, हे या तीन राजकीय व्यक्तित्वांच्या इतिहासाकडे बघून कळेल. अशी गत बिहारमध्ये यापूर्वी जितनराम मांझी यांची झाली. पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची खुमखुमी उपेंद्र कुशवाहा यांच्यात निर्माण झाली आहे. मात्र, यावेळी त्यांना थेट सत्तेवर येण्याची परिस्थिती तीळमात्र नाही. परंतु, त्यांच्या सर्व कृतीमागे भारतीय जनता पक्षाचा हात असल्याचा राजकीय संशय आहे. बिहार च्या राजकारणात सर्वात महत्वाची बाब म्हणजे तेथील राजकीय नेते हे आपापल्या जातसमुहाचेही नेते असतात. त्यांच्या मागे जातीचे एकगठ्ठा असणे, ही बिहारच्या राजकारणाची खासियत आहे. दिवंगत रामविलास पासवान यांच्या राजकीय उदयापासून त्यांच्यासोबत दुसाद समाज कायम राहीला. त्यांच्या भिस्तवर त्यांचे राजकारण जागतिक स्तरावर गाजले.

यादव समुहाची संख्या अधिक असल्याने लालूप्रसाद यादव यांच्या राजकारणाला शह देणे कुणालाही जमले नाही. तर, यादव खालोखाल असणारे कुर्मी यांच्यावर नितिशकुमार यांचा असलेला पगडा त्यांना गेली वीस वर्षे राज्याच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान होण्यास महत्वपूर्ण ठरला आहे. त्यासोबतच त्यांनी कोईरी-कुशवाहा या जातींना आपल्या सोबत आणले. त्यात उपेंद्र कुशवाहा हे महत्वाचे घटक मानले जातात. त्यामुळे, या उपेंद्र कुशवाहा यांच्या मनात आता मुख्यमंत्री पदाची महत्वाकांक्षा जागली आहे! अर्थात, ती महत्वाकांक्षा जागली की जागवली हा वेगळा आणि वादाचा मुद्दा आहे. या कुशवाहा महाशयांनी आपल्या जात समुहाची लोकसंख्या राज्यात अवघी तीन टक्के असताना राज्याच्या सर्वोच्च पदाची लालसा धरणं हे वस्तुस्थितीला धरून नाही. बिहार, उत्तर प्रदेश च्या राजकारणात जातीची समीकरणे फार काटेकोर असतात. मतदार दारिद्रयात असला तरी राजकीय विश्लेषक असतो. ही वस्तुस्थिती इतर राज्यांत दिसून येत नाही. तेजस्वी यादव यांना यापुढील राजकीय वारस घोषित करणारे नितिशकुमार यांनी भाजपला बिहारमध्ये आव्हान दिल्याने, प्रतिशोधात असणाऱ्या भाजपने कुशवाहा यांना नितिशकुमार समोर आव्हान म्हणून पुढे आणल्याचे सध्यातरी दिसते. मात्र, नजिकच्या भविष्यकाळात कुशवाहा यांना प्रतिशह उभा करण्यात नितिशकुमार यशस्वी होतील, अशीच सध्याची परिस्थिती आहे!

COMMENTS