मुंबई/प्रतिनिधी ः अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दिवस बुधवारी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या विधिमंडळ नव्हे चोरमंडळ या वक्तव्याचे पडसाद विध

मुंबई/प्रतिनिधी ः अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दिवस बुधवारी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या विधिमंडळ नव्हे चोरमंडळ या वक्तव्याचे पडसाद विधिमंडळात उमटले. सत्ताधार्यांनी आक्रमक पवित्रा घेत, संजय राऊत यांना अटक करण्याची मागणी केली, तर सत्ताधार्यांनी देखील याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली. राऊत यांच्या वक्तव्यामुळे विधिमंडळ सदस्यांचा अपमान झाल्याचे सांगत त्यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव सादर करावा आणि राऊत यांना अटक करावी अशी मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी विधानसभेत केली.
दरम्यान, संजय राऊत कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलताना नेमके काय म्हणाले याचा येत्या दोन दिवसात सखोल तपास करून अंतिम निर्णय घेऊ अशी भूमिका विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेतली आहे. विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेमुळे संतुष्ट न झालेल्या सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी दोन्ही सभागृहात राऊत यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करून गोंधळ सुरूच ठेवला. यामुळे विधानसभा आणि विधानपरिषदेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत सध्या कोल्हापूरच्या दौर्यावर आहेत. कोल्हापूर शहरात बुधवारी सकाळी माध्यमांसमोर बोलताना राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाच्या आमदारांवर जोरदार टीका केली होती. ‘शिंदे यांची शिवसेना ही बनावट, डुप्लिकेट आहे. चोरांचे मंडळ चोरमंडख, विधिमंडळ नव्हे चोरमंडळ आहे. त्यांनी आम्हाला पदावरून काढले तरी आम्ही काय पक्ष सोडणार आहोत का? अशी अनेक पदे पक्षाने आम्हाला दिली आहेत. पदे गेलीत तरीही पदे परत येतील. आमचा पक्ष महत्वाचा आहे.’ असे वक्तव्य राऊत यांनी केले होते. संजय राऊत यांनी विधिमंडळाच्या सदस्यांना चोर म्हणून संबोधून सभागृहाचा अपमान केल्याचा आरोप भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केला. राऊत यांना लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी भातखळकर यांनी केली. राऊत आज विधिमंडळ सदस्यांना चोर म्हणताएत उद्या ते आम्हाला गुंड म्हणतील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध करत भाजप आमदार कालिदास कोळंबकर, शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनीही मते मांडली.
…तर, उद्धव ठाकरेही चोरमंडळाचे सदस्य ः फडणवीस राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही संजय राऊतांच्या विधानाचा निषेध केला आहे. विधिमंडळाला चोर म्हणणे हे सहन करण्यासारखे नाही. या विधानमंडळाला मोठी परंपरा आहे. अनेक मोठे नेते या सभागृहाने बघितले आहेत. आपल्या राज्याचं विधानमंडळ हे देशातील सर्वोत्कृष्ट असे विधानमंडळ आहे. हा विषय एका पक्षापुरता मर्यादित नाही. विधिमंडळ म्हटल्यानंतर उद्धव ठाकरे सुद्धा सभागृहाचे सदस्य आहे. मग तेही चोरमंडळाचे सदस्य ठरतात. आम्ही सर्वचचोर मंडळाचे सदस्य ठरतो. राऊतांनी केवळ चोरमंडळ नाही, तर गुंडमंडळ असा शब्दही वापरला आहे. आम्ही काय गुंड आहोत का? असा प्रश्नही फडणवीसांनी विचारला.
ठाकरे गटाकडून मुख्यमंत्री शिंदेंविरोधात हक्कभंग – विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव सादर केला आहे. या प्रकरणी दानवे यांनी उपसभापती नीलम गोर्हे यांना पत्र दिले आहे. विरोधी नेत्यांनी सत्ताधारी नेत्यांच्या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होता. त्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी देशद्रोह्यांबरोबर चहापान टाळले असे विधान केले होते. त्यामुळे त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. तर हे देशद्रोही कोण?. हा माझा प्रश्न आहे. आम्ही कोणता गुन्हा केला आहे. त्यामुळे आमच्या अधिकाराचा अपमान मुख्यमंत्र्यांनी केला आहे. त्यामुळे आम्ही हक्कभंगाचा प्रस्ताव दिला, असे अंबादास दानवे यांनी सांगितले.
COMMENTS