बीड : महावितरणकडून स्मार्ट मीटरबाबत वीज ग्राहकांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी आणि वस्तुनिष्ठ माहिती देण्यासाठी आजपासून जिल्हाभरात उपविभागनिहाय

बीड : महावितरणकडून स्मार्ट मीटरबाबत वीज ग्राहकांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी आणि वस्तुनिष्ठ माहिती देण्यासाठी आजपासून जिल्हाभरात उपविभागनिहाय ‘ग्राहक समाधान मेळाव्यांचे’ आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यांमध्ये ग्राहकांना स्मार्ट मीटरची कार्यपद्धती, त्याचे फायदे तसेच वीज वापराचे अचूक व्यवस्थापन कसे करावे, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे.
अंबाजोगाई विभागांतर्गत अंबाजोगाई उपविभाग क्रमांक १ व २, धारूर, माजलगाव व तेलगाव उपविभागात मंगळवारी (दि. १६ जून) मेळावे पार पडले. तर आज बुधवारी (दि. १७ जून २०२६) केज व परळी उपविभागात सकाळी ११ ते दुपारी १२ वाजेदरम्यान हे मेळावे होतील. याचसोबत, बीड विभागातील बीड शहर व ग्रामीण उपविभाग, आष्टी, गेवराई, पाटोदा व शिरूर कासार उपविभागांतर्गत आज बुधवारी (दि. १७ जून) सकाळी १० ते दुपारी १२ वाजेदरम्यान या ग्राहक समाधान मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
महावितरणच्या वतीने स्पष्ट करण्यात आले की, स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना त्यांच्या वीज वापराची माहिती ‘रिअल-टाईम’मध्ये उपलब्ध होते. यामुळे वीज वापरावर नियंत्रण ठेवणे आणि अनावश्यक खर्च टाळणे सुलभ होईल. तसेच मीटर रीडिंगसाठी कर्मचाऱ्याची गरज उरणार नसल्याने बिलिंग प्रक्रिया अधिक अचूक व पारदर्शक बनेल. मीटरमध्ये छेडछाड झाल्यास यंत्रणेला त्वरित माहिती मिळणार असल्याने वीज सुरक्षा वाढेल. या मेळाव्यांमध्ये अधिकारी व तंत्रज्ञ नागरिकांच्या सर्व शंकांचे निरसन करणार असून ग्राहकांनी या मेळाव्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

COMMENTS