कल्याण : कल्याणच्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर आज सकाळपासूनच प्रचंड तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. बकरी ईदच्या नमाज पठणाच्या काळात किल्ल्यावर

कल्याण : कल्याणच्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर आज सकाळपासूनच प्रचंड तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. बकरी ईदच्या नमाज पठणाच्या काळात किल्ल्यावरील दुर्गादेवी मंदिरात हिंदू भाविकांना दर्शनासाठी प्रवेश नाकारण्यात आला. या प्रशासकीय निर्णयाविरोधात शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट आणि हिंदूत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आणि त्यांनी पोलिसांचे कडे कडकडीत मोडून काढत जोरदार आंदोलन केले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही बकरी ईदच्या निमित्ताने दुर्गाडी किल्ल्याच्या परिसरात नमाज पठण करण्यात आले. मात्र, कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण पुढे करत पोलिसांनी तब्बल ३० मिनिटे दुर्गादेवी मंदिरातील दर्शनावर निर्बंध लादले होते. मंदिराची घंटाही दोरीने बांधण्यात आली होती. याचाच निषेध करण्यासाठी कल्याण, डोंबिवली आणि आसपासच्या परिसरातून हजारो शिवसैनिक लालचौकी भागात जमा झाले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि दिवंगत आनंद दिघे यांनी ४० वर्षांपूर्वी सुरू केलेली ‘घंटानाद आंदोलनाची’ परंपरा कायम ठेवत शिवसैनिकांनी संपूर्ण परिसर ‘दुर्गाडी किल्ला आमच्या हक्काचा’ अशा घोषणांनी दणाणून सोडला. काही आक्रमक कार्यकर्ते पोलिसांच्या उंच बॅरिकेड्सवर चढले आणि त्यांनी पुढे जाण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी शिवसेना उपनेते विजय साळवींसह अनेक प्रमुख नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
एकदाचे नमाज पठण शांततेत पार पडल्यानंतर पोलिसांनी तातडीने दुर्गादेवीचे मंदिर हिंदू भाविकांसाठी दर्शनाला खुले केले. परंतु, “नमाज मशिदीत व्हावी, रस्त्यावर नाही आणि नमाजाच्या नावाखाली हिंदूंना मंदिरात जाण्यापासून का रोखले जाते?” असा आक्रमक सवाल करत भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांनी यावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे.
तूर्तास दुर्गाडी किल्ला आणि लालचौकी परिसरात २०० हून अधिक पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात असून वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. आंदोलन आटोक्यात आले असले तरी कल्याणमधील राजकीय आणि धार्मिक वातावरण मात्र चांगलेच तापले आहे.

COMMENTS