संगमनेर : शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी आमदार रोहित पवार यांनी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला काँग्रेसचे ज्येष्ठ न

संगमनेर : शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी आमदार रोहित पवार यांनी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. सरकारने या आंदोलनाकडे राजकीय चष्म्यातून न पाहता राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून त्यांचा सातबारा तातडीने कोरा करावा, अशी मागणी थोरात यांनी केली आहे.
या आंदोलनाला पाठिंबा देताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, निवडणूक काळात सरकारने सरसकट कर्जमाफीची मोठी आश्वासने दिली होती. मात्र, दीड वर्ष उलटून गेल्यानंतरही यावर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. सध्या सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही अत्यंत तुटपुंजी आणि जाचक अटींनी वेढलेली आहे. याउलट, महाविकास आघाडी सरकारच्या काळात पहिल्याच कॅबिनेट बैठकीत दोन लाखांपर्यंतची सरसकट कर्जमाफी आणि नियमित कर्ज फेडणाऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले गेले होते, याची आठवण त्यांनी करून दिली.
शेतकरी हा जगाचा पोशिंदा असून तो सध्या मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्याला आधार देणे ही सरकारची पहिली जबाबदारी आहे. आमदार रोहित पवार यांनी शेतकऱ्यांसाठी घेतलेली भूमिका अत्यंत योग्य असून सरकारने या विषयावर आपली भूमिका तात्काळ स्पष्ट करावी. आता सरसकट कर्जमाफीशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही, असे आवाहनही थोरात यांनी सरकारला केले आहे.

COMMENTS