Homeताज्या बातम्यासंपादकीय

शिवसेनेचा घसरता आलेख

राज्यात एकेकाळी शिवसेनेचा मोठा दरारा होता. भलेही जागा कमी-जास्त असल्या तरी,कोणत्याही महत्वपूर्ण निर्णयात शिवसेनेचे मत विचारात घेतल्याशिवाय पुढे ज

आश्‍वासनांची खैरात आणि अर्थव्यवस्थेचे दिवाळे
इंडिया आघाडीची वाट बिकट
प्रदूषणामुळे मिळेना शुद्ध हवा

राज्यात एकेकाळी शिवसेनेचा मोठा दरारा होता. भलेही जागा कमी-जास्त असल्या तरी,कोणत्याही महत्वपूर्ण निर्णयात शिवसेनेचे मत विचारात घेतल्याशिवाय पुढे जाता येत नव्हते. मात्र अलीकडच्या काही वर्षात शिवसेनेने हा दरारा कमी करून घेतला आहे. खुद्द उद्धव ठाकरे यांच्याच नेतृत्वाला आव्हान देत, शिंदे गट बाहेर पडला. केवळ बाहेरच नव्हे तर 40 आमदार आणि 12-13 खासदार सोबत घेऊन बाहेर पडला. तेव्हापासून शिवसेनेचा दरारा आणि आलेख सातत्याने घसरत चालला आहे.  गेल्या सहा महिन्यापासून महाविकास आघाडीच्या सरकारला पायउतार झाल्यानंतर शिवसेनेच्या काही आमदारांनी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मान्य करत बंड केले. हे बंड शिवसेनेच्या पक्षश्रेष्ठींना मोडून काढता आले नाही.

अखेर या बंडाने शिवसेना पक्षाच्या चिन्हास गोठवण्याची प्रक्रिया झाली. त्यामुळे शिवसेनेला नव्या पक्ष चिन्हासाठी पुन्हा निवडणूक आयोगाच्या सोपस्करास सामोरे जावे लागले. स्व. बाळासाहेब ठाकरे ज्या पध्दतीने दरारा ठेवत होते तसा दरारा ठेवण्यात उध्दव ठाकरे अपयशी ठरल्यासारखे वाटत आहे. मात्र, गेल्या काही दिवसापासून राजकारण्यांबाबत बर्‍याच भविष्यवाण्या होवू लागल्या आहेत. अर्थात भविष्यात घडणार्‍या गोष्टींबाबत वक्तव्य एकरणे म्हणजे भुलथापा म्हणावे लागते. कारण राजकारण हे क्षेत्र असे काही आहे की, आत्ता होते म्हणतात तोच कुठे, मग कधी? असा विचार प्रयोग होताना आपणास दिसत आहे. तसाच प्रकार महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्यापूर्वी पहाटेचा शपथविधी पाहून सर्व वृत्तपत्रांच्या प्रतिंना वाचकांनी नाकारले होते.

तसाच प्रकार आता सत्तेत असतानाही दुसर्‍या पक्षाकडून कोणती संधी मिळते का? याची चाचपणी होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसापूर्वी खटाव-माणचे भाजपचे आ. जयकुमार गोरे यांचा अपघात झाल्यानंतर प्रकृतीची चौकशी करण्यासाठी रुग्णालयात थेट खा. शरद पवार पोहोचले. म्हणजे आ. गोरे राष्ट्रवादीच्या गळाला लागले की का? असा सवाल उपस्थित होवू लागला आहे. याचे कारण म्हणजे आ. गोरे यांच्यापेक्षा अवघ्या 2700 मताच्या फरकाने खा. शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जाणारे व सध्या राष्ट्रवादीचे नेते माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांना पराभव पत्करावा लागला होता. खटाव-माण मतदार संघ काँग्रेस व राष्ट्रवादीच्या जागा वाटपात काँग्रेसला गेला होता. मात्र, आ. गोरे यांनी अचानक काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे भविष्यकाळात आ. गोरे राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार असणार की काय? असा सवाल उपस्थित होत आहे. तसेच राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार सदाशिव पोळ यांच्या मुलाने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे महंत अनिकेतशास्त्री देशपांडे (अधिपती- महर्षी पंचायतन सिध्दपीठम्) यांच्या भविष्यवाणीप्रमाणे याही परिस्थितीत राजकारणात खा. पवार यांची भूमिका विशेष लक्षवेधी ठरेल. त्यामुळे यंदा वर्षी शरद पवार सत्तापालट करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याची ही सुरुवात तर नसेल ना? असे झाल्यास राज्यातील राजकारणाचे चित्र पुर्णपणे बदलण्यास वेळ लागणार नाही.

गेल्या काही दिवसापासून माजी मुख्यमंत्री आ. उध्दव ठाकरे यांचे पारडे नववर्षापासून जड होण्यास सुरुवात होताना विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर अडचणी वाढण्याची शक्यता असल्याची भविष्यवाणी केली आहे. अर्थात पक्षांतर बंदी कायद्यातील तरतूदीनुसार एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य 15 आमदारांच्या निलंबनाबाबत सुप्रिम कोर्टात सुनावणी होणार आहे. त्या निकालावर महाराष्ट्राच्या राजकारणातील चढ-उतार पहायला मिळणार आहेत. गेल्या दोन दिवसापासून कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना विरोधकांनी घेरले असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी तर खताच्या वाटपातील घोळ सभागृहात मांडून शेतकर्‍यांच्या प्रश्‍नासाठी सरकाने तत्पर राहण्याची गरज असल्याची मागणी केली. त्यामुळे राजकारण्यांच्या सिल्व्हर, ब्रॉझ, गोल्डन तिकिटाच्या माध्यमातून कृषि महोत्सव भरणार की अधिकार्‍यांसह राजकारण्यांचे उखळ पांढरे होणार याचा सोक्ष-मोक्ष लावण्याचीही मागणी होत आहे. नववर्षात राजकिय क्षेत्रात मोठा बदल होणार असल्याच्या भविष्यवाणीला आज जरी थोतांड असे समजले जात असले तरी राजकारणात काहीही होवू शकते, हे मात्र नाकारता येणार नाही.

COMMENTS