कोल्हापूर : देशातील महत्त्वाच्या शिक्षणसंस्थांचे प्रणेते, माजी राज्यपाल आणि पद्मश्री पुरस्कार विजेते ज्ञानदेव यशवंतराव पाटील अर्थात डी. वाय. पाटी

कोल्हापूर : देशातील महत्त्वाच्या शिक्षणसंस्थांचे प्रणेते, माजी राज्यपाल आणि पद्मश्री पुरस्कार विजेते ज्ञानदेव यशवंतराव पाटील अर्थात डी. वाय. पाटील यांचे कोल्हापूरमध्ये निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ९० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. २२ ऑक्टोबर १९३५ रोजी त्यांचा जन्म झाला होता. महाराष्ट्रात त्यांना ‘शिक्षणमहर्षी’ या उपाधीने ओळखले जात होते. त्यांनी शिक्षण, आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रात मोठे साम्राज्य उभारले होते. डी. वाय. पाटील यांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली होती. मात्र, काही काळानंतर त्यांनी सक्रिय राजकारणापासून बाजूला होत आपले पूर्ण लक्ष शिक्षण क्षेत्रावर केंद्रित केले होते.
डॉ. डी. वाय. पाटील यांचा परिवार शिक्षण, आरोग्य, उद्योग आणि सार्वजनिक जीवनात सक्रिय आहे. त्यांच्या कुटुंबात अनेक सदस्य विविध शैक्षणिक संस्थांच्या व्यवस्थापनाशी संबंधित आहेत. त्यांचे पुत्र डॉ. संजय डी. वाय. पाटील, सतेज उर्फ बंटी डी. वाय. पाटील, विजय डी. पाटील, डॉ. अजिंक्य डी. वाय. पाटील यांच्यासह कन्या डॉ. नंदिता पालशेतकर आणि इतर सदस्य शिक्षण व आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांचे नातू ऋतुराज पाटील हेही सार्वजनिक जीवनात सक्रिय आहेत.
वैयक्तिक जीवन आणि पार्श्वभूमी
- जन्म: २२ ऑक्टोबर १९३५ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील अंबाप या एका छोट्याशा शेतीप्रधान गावात त्यांचा जन्म झाला.
- पार्श्वभूमी: एका साध्या बहुजन शेतकरी कुटुंबातून पुढे येत त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
- कुटुंब: त्यांच्या घरात राजकीय आणि सामाजिक वारसा आहे. त्यांचे पुत्र सतेज पाटील (माजी गृहराज्यमंत्री, महाराष्ट्र) आणि डॉ. संजय डी. पाटील, तसेच नातू ऋतुराज पाटील हे देखील राजकारण आणि समाजकारणात सक्रिय आहेत.
शैक्षणिक साम्राज्य (डी. वाय. पाटील ग्रुप)
डी. वाय. पाटील यांनी वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षी सक्रिय राजकारणातून काहीसा संन्यास घेत शिक्षणाचा वटवृक्ष उभारण्यास सुरुवात केली.
- सुरुवात: त्यांनी १९८३ मध्ये नवी मुंबईत ‘रामराव आदिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी’ (RAIT) या पहिल्या अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना केली.
- विस्तार: आज त्यांच्या डी. वाय. पाटील ग्रुप अंतर्गत कोल्हापूर, मुंबई, पुणे यांसारख्या शहरांमध्ये ३ हून अधिक डीम्ड युनिव्हर्सिटीज, ६ खाजगी विद्यापीठे आणि १८० पेक्षा जास्त शिक्षण संस्था कार्यरत आहेत.
- क्षेत्रे: अभियांत्रिकी, वैद्यकीय (मेडिकल), फार्मसी, मॅनेजमेंट, आर्किटेक्चर आणि कृषी यांसारख्या विविध क्षेत्रांत त्यांचे उत्तम जाळे पसरलेले आहे. देश-विदेशातील हजारो विद्यार्थी आज त्यांच्या संस्थांमध्ये शिक्षण घेत आहेत.
राजकीय कारकीर्द आणि राज्यपालपद
त्यांची राजकीय कारकीर्द प्रामुख्याने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधून सुरू झाली. १९५७ मध्ये ते काँग्रेसच्या तिकिटावर कोल्हापूर नगरपालिकेवर निवडून आले आणि १९५७ ते १९६२ या काळात ते कोल्हापूरचे महापौर होते. त्यानंतर १९६७ आणि १९७२ मध्ये ते पन्हाळा मतदारसंघातून विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले. २०१८ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) प्रवेश केला होता.
त्यांच्या प्रदीर्घ अनुभवामुळे त्यांची भारताच्या विविध राज्यांचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली:
- त्रिपुराचे राज्यपाल: २००९ ते २०१३
- बिहारचे राज्यपाल: २०१३ ते २०१४
- पश्चिम बंगालचे राज्यपाल: (अतिरिक्त कार्यभार)राज्यपाल म्हणून त्यांनी शिक्षण, प्रशासन आणि सामाजिक उपक्रमांना प्रोत्साहन देणारे निर्णय घेतले.
क्रीडा आणि आरोग्य क्षेत्रातील योगदान
- डी. वाय. पाटील स्टेडियम: नवी मुंबईतील नेरुळ येथे असलेले जागतिक दर्जाचे डी. वाय. पाटील स्टेडियम हे त्यांच्याच क्रीडा अकादमीच्या मालकीचे आहे. या स्टेडियममध्ये अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने, आयपीएल (IPL) आणि फुटबॉल स्पर्धांचे आयोजन झाले आहे.
- आरोग्य सेवा: त्यांनी गरिबांसाठी अनेक चॅरिटेबल हॉस्पिटल्स आणि वैद्यकीय संशोधन केंद्रे सुरू करून आरोग्य क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे.
पुरस्कार आणि सन्मान
- पद्मश्री पुरस्कार: शिक्षण आणि समाजसेवेतील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल भारत सरकारने १९९१ मध्ये त्यांना ‘पद्मश्री’ या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले.
- मानद डॉक्टरेट: त्यांना अमेरिकेच्या ‘वर्ल्ड युनिव्हर्सिटी राउंडटेबल’ (१९८५), ब्रिटनच्या ‘नॉटिंगहॅम ट्रेंट युनिव्हर्सिटी’ (१९९६) आणि शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर (२०१५) कडून मानद डॉक्टरेट आणि ‘डी.लिट’ पदवी प्रदान करण्यात आली आहे.
डी. वाय. पाटलांच्या निधनानंतर दिग्गज नेत्यांकडून शोक व्यक्त
डी. वाय. पाटील यांच्या निधनानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. “मला धक्का बसला आहे. शून्यातून, कष्टातून त्यांनी शिक्षणाचे एक विश्व उभं केलं. पवार कुटुंब, सुळे कुटुंब आणि पाटील कुटुंब यांचे गेल्या चार-पाच दशकांचे स्नेहाचे संबंध राहिले आहेत,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही शोक व्यक्त करत म्हटले, “महाराष्ट्राच्या राजकारण, शैक्षणिक आणि सामाजिक जीवनातील उत्तुंग नेतृत्व आज हरपलं आहे. त्यांनी अनेक शैक्षणिक व क्रीडा संस्था उभ्या केल्या. आमचा अत्यंत घनिष्ट कौतुक आणि कौटुंबिक स्नेह होता. दादांच्या जाण्याने कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे.”

COMMENTS