नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियातील लोकप्रिय टी-20 बिग बॅश लीग प्रथमच भारताच्या भूमीवर खेळवली जाणार असून, क्रिकेट विश्वासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा ठरणा
नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियातील लोकप्रिय टी-20 बिग बॅश लीग प्रथमच भारताच्या भूमीवर खेळवली जाणार असून, क्रिकेट विश्वासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रीडा सहकार्याला नवे परिमाण देणार्या या उपक्रमाची घोषणा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांनी संयुक्तपणे केली. या निर्णयामुळे भारतीय क्रिकेटप्रेमींना प्रथमच आपल्या देशात टी-20 बिग बॅश लीगचा थरार अनुभवता येणार आहे.
या स्पर्धेच्या सोळाव्या पर्वातील उद्घाटनाचा सामना 12 डिसेंबर रोजी चेन्नई येथील एम. ए. चिदंबरम मैदानावर खेळविण्यात येणार आहे. या सामन्यात मेलबर्न रेनेगेड्स आणि विद्यमान विजेता पर्थ स्कॉर्चर्स हे संघ आमनेसामने येणार असून, क्रिकेट चाहत्यांमध्ये या लढतीबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. भारतात कोणत्याही परदेशी व्यावसायिक क्रिकेट स्पर्धेचा सामना आयोजित होण्याची ही पहिलीच वेळ असल्याने या सामन्याला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. डिसेंबर महिन्यात भारतात होणार्या आठवडाभराच्या ऑस्ट्रेलियन सांस्कृतिक महोत्सवातील हा सामना प्रमुख आकर्षण ठरणार आहे. त्यामुळे केवळ क्रीडा क्षेत्रातच नव्हे, तर सांस्कृतिक देवाणघेवाणीतही या उपक्रमाची महत्त्वपूर्ण भर पडणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या मते, जगातील सर्वात मोठी क्रिकेटप्रेमी बाजारपेठ म्हणून भारताची ओळख आहे. त्यामुळे येथे सामना आयोजित केल्यास टी-20 बिग बॅश लीगची लोकप्रियता वाढण्याबरोबरच स्पर्धेला नवे प्रेक्षक मिळतील. भारतीय चाहत्यांपर्यंत स्पर्धा अधिक प्रभावीपणे पोहोचविण्याचा हा प्रयत्न असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. या ऐतिहासिक सामन्यासाठी चेन्नईची निवड करण्यामागे अनेक कारणे असल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्पष्ट केले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि ऑस्ट्रेलियाच्या महावाणिज्य दूतावासाच्या सहकार्याने हा निर्णय घेण्यात आला. चेन्नईतील क्रिकेटविषयीचे प्रचंड आकर्षण, तेथील जाणकार प्रेक्षक आणि स्थानिक संघाला मिळणारा मोठा पाठिंबा या सर्व बाबींचा विचार करून हे शहर निवडण्यात आले.
हजारो चाहत्यांसमोर रंगणार सामना
सुमारे 38 हजार प्रेक्षक क्षमता असलेल्या एम. ए. चिदंबरम मैदानावर हा सामना खेळविण्यात येणार आहे. या लढतीत मेलबर्न रेनेगेड्स यांना यजमान संघाचा दर्जा असेल. दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत अपेक्षित असल्याने मैदानावर मोठ्या संख्येने क्रिकेटप्रेमी उपस्थित राहतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
भारत-ऑस्ट्रेलिया क्रीडा संबंधांना मिळणार नवे बळ
या उपक्रमामुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रीडा सहकार्य अधिक दृढ होईल, असा विश्वास क्रिकेट ऑस्ट्रेलियाने व्यक्त केला आहे. भारतीय चाहत्यांना टी-20 बिग बॅश लीग प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मिळणार असून, भविष्यात अशा आणखी आंतरराष्ट्रीय उपक्रमांना चालना मिळण्याची शक्यता आहे. क्रिकेटप्रेमींच्या दृष्टीने हा सामना केवळ एका स्पर्धेचा प्रारंभ नसून, दोन क्रिकेटप्रेमी राष्ट्रांमधील मैत्री, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि क्रीडा सहकार्याचा नवा अध्याय ठरणार असल्याचे मानले जात आहे.

COMMENTS