कृषी गोल्ड, विगोर मालविका, उन्नती आणि रविसिड्स कंपनीच्या सोयाबीन बियाण्यांची पेरणी करूनही बियाणे न उगवल्याने किनवट तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाल

कृषी गोल्ड, विगोर मालविका, उन्नती आणि रविसिड्स कंपनीच्या सोयाबीन बियाण्यांची पेरणी करूनही बियाणे न उगवल्याने किनवट तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. अनुकूल हवामान असतानाही बियाणे न उगवल्याने शेतकर्यांवर दुबार पेरणीचे मोठे संकट ओढावले आहे. या गंभीर प्रकारानंतर किनवट तालुका शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत, तात्काळ शेतावर जाऊन पंचनामे करण्याची आणि बोगस बियाणे कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी सहाय्यक जिल्हाधिकार्यांकडे केली आहे.
या संदर्भात शिवसेना तालुकाप्रमुख बालाजी मुरकुटे यांनी प्रशासनाला सज्जड इशारा दिला आहे. ते म्हणाले:अनेक शेतकर्यांच्या 10 ते 15 बॅगा सोयाबीन पूर्णपणे वाया गेले आहे. पेरणीसाठी वेळेला अत्यंत महत्त्व असते, ’वटी आणि मुठी’मध्ये मोठा फरक असतो. दुबार पेरणीमुळे मुख्य उत्पादनावर मोठा परिणाम होतो, त्यामुळे केवळ बियाणे देऊन शेतकर्यांची बोळवण करू नका, तर झालेल्या सर्व नुकसानीची भरपाई कंपन्यांकडून मिळवून द्या. मागील इतिहास पाहता बोधडी आणि सारखणी येथील वादग्रस्त कृषी केंद्रांवर केवळ नावापुरती किंवा संथ गतीने कारवाई केली जाते. स्वतःच्या फायद्यासाठी शेतकर्यांचे नुकसान करणार्या अशा बोगस बियाणे विक्रेत्यांना कायमचे ’ब्लॅकलिस्ट’ (काळ्या यादीत) टाकून त्यांच्यावर कठोर फौजदारी कारवाई केल्याशिवाय ही बोगसगिरी थांबणार नाही, असा संतप्त सूर शिवसेनेने आळवला आहे. या प्रकरणी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या शिष्टमंडळाने सहाय्यक जिल्हाधिकारी आणि तालुका कृषी अधिकार्यांची भेट घेऊन लेखी तक्रार दाखल केली. या शिष्टमंडळात मनोज तिरमनवार (शिवसेना नांदेड जिल्हा सचिव) बालाजी मुरकुटे (तालुका प्रमुख) सुरेश घुमडवार (तालुका उपप्रमुख) सुरज सातुरवार (शहर प्रमुख) गंगुबाई परेकार (महिला आघाडी तालुका प्रमुख)तसेच मारोती सुंकलवाड, ब्राह्मानंद मुंडे, कपील रेड्डी, साईराम कलकुंटवार, सुनील गरड, बबन वानखेडे आणि परिसरातील बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पदाधिकार्यांचा समावेश होता. प्रशासनाने यावर तात्काळ पावले न उचलल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही या वेळी देण्यात आला आहे.

COMMENTS