श्रीगोंदा : तालुक्यातील काष्टी ग्रामपंचायतीत मासिक सभांना सतत गैरहजर राहिल्याप्रकरणी काही सदस्यांना ग्रामपंचायतीकडून नोटीस बजावण्यात आली आहे. या

श्रीगोंदा : तालुक्यातील काष्टी ग्रामपंचायतीत मासिक सभांना सतत गैरहजर राहिल्याप्रकरणी काही सदस्यांना ग्रामपंचायतीकडून नोटीस बजावण्यात आली आहे. या कारवाईमुळे स्थानिक पातळीवर राजकीय व प्रशासकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, काष्टी ग्रामपंचायतीच्या सदस्य मालन ज्ञानदेव गवते, संध्या अजिनाथ कोकाटे, रेश्मा वसंत पाचपुते तसेच सुरज नानासाहेब राहींज यांना ग्रामपंचायत कार्यालयाकडून अधिकृत पत्र देण्यात आले आहे. संबंधित सदस्य मागील काही महिन्यांपासून मासिक सभांना गैरहजर राहत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
ग्रामपंचायत नियमांनुसार, एखादा सदस्य सलग तीन महिने किंवा एकूण सहा महिने (१८० दिवस) मासिक सभांना अनुपस्थित राहिल्यास त्याचे सदस्यत्व रद्द होऊ शकते, असा स्पष्ट इशारा नोटीसमध्ये देण्यात आला आहे. तसेच, नोटीस मिळाल्यानंतर पुढील सभांना नियमित उपस्थित राहण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
दरम्यान, या सदस्यांव्यतिरिक्त इतर काही सदस्यही गैरहजर असताना सर्वांनाच नोटीस देण्यात आलेली नाही, असा आरोप संबंधित सदस्यांच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे. विशेषतः ग्रामपंचायत सदस्य पती भैरवनाथ सोसायटीच मा. व्हा.चेअरमन ज्ञानदेव गवते यांनी माहितीचा अधिकार कायद्यांतर्गत अर्ज करून याबाबत सविस्तर माहिती मागविली असल्याचे समोर आले आहे.
या घडामोडींमुळे ग्रामपंचायत प्रशासन आणि संबंधित सदस्य यांच्यात वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने नियमांनुसार कारवाई केल्याचे सांगितले जात असले, तरी या प्रकरणामागे राजकीय पार्श्वभूमी असल्याची चर्चा गावात रंगू लागली आहे.
या प्रकरणी पुढे काय निर्णय घेतला जाणार, संबंधित सदस्य सभांना हजर राहणार का, तसेच ग्रामपंचायतीकडून पुढील कारवाई काय होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS