उद्धव ठाकरे यांना नाही कणा ; ॲड. आंबेडकर यांची टीका; सरकार बरखास्तीची मागणी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उद्धव ठाकरे यांना नाही कणा ; ॲड. आंबेडकर यांची टीका; सरकार बरखास्तीची मागणी

महाविकास आघाडी सरकारमध्ये गुन्हेगारी वृत्ती आहे.

गुन्हेगारीचा चढता आलेख !
कामगार संघटनांनी पाळला बंद
मुंबईमधील नेरुळ येथे तीन मजली इमारतीचा स्लॅब कोसळला

पुणे/प्रतिनिधी: महाविकास आघाडी सरकारमध्ये गुन्हेगारी वृत्ती आहे. त्यामुळे हे सरकार बरखास्त करून राज्यात नवे सरकार आले पाहिजे, असे मत वंचित बहुजन आघाडीचे नेते  ॲड. प्रकाश आंबेडकर  यांनी व्यक्त केले. उद्धव ठाकरे हे गेल्या पाच वर्षांमध्येही सत्तेत होते. या गोष्टी त्यांना माहिती नाहीत, असे नव्हे; पण ठाकरे यांना कणा नाही. त्यांना कठोर निर्णय घेता येत नाहीत, अशी खरमरीत टीका त्यांनी केली. 

ते रविवारी प्रसार माध्यमांशी बोलत होते. या वेळी महाराष्ट्राच्या राजकारणापासून ते पश्चिम बंगालची निवडणूक अशा विषयांवर चौफेर फटकेबाजी केली. सरकारमधील मंत्र्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना पैसे गोळा करायला सांगितले होते, ही सत्य परिस्थिती आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून हा आदेश देण्यात आला होता का? मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर चर्चा झाली होती का, असे सवाल त्यांनी केले.  राज्यात सध्या गाजत असलेल्या फोन टॅपिंग प्रकरणावरही ॲड. आंबेडकर यांनी  भाष्य केले. सध्याच्या घडीला आठ यंत्रणा माझा फोन टॅप करत आहेत. मी सरळ सरळ हा आरोप करत आहे; मात्र मी कुणाकडे पैसे मागत नाही. त्यामुळे मला कसलीही भीती वाटत नसल्याचे त्यांनी सांगितले. पश्चिम बंगालच्या निवडणूक प्रचारात नियमांचे उल्लंघन केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत:च आदेशांची पायमल्ली करत आहेत; मात्र पोलिसांनी त्यांच्यावर एकही गुन्हा दाखल केलेला नाही. माझे पोलिसांना आव्हान आहे की, त्यांनी मोदींवर गुन्हा दाखल करुन दाखवावा. मोदी पश्चिम बंगालमध्ये जितका प्रचार करतील, तेवढा फायदा ममता बॅनर्जी यांना होईल, असे सांगून ॲड. आंबेडकर म्हणाले, की बंगालच्या लोकांना कोणीही डिवचलेले आवडत नाही; परंतु मोदी वारंवार त्यांना बंगालमध्ये जाऊन डिवचत आहेत. त्यामुळे मोदी जितक्या वेळा बंगालमध्ये  सभा घेतील, तितक्या ममता बॅनर्जींच्या जागांमध्ये भर पडेल.

COMMENTS