कोपरगाव: कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील नागरिकांचा अनेक वर्षांपासूनचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याच्या दृष्टीने महत्त्वाच

कोपरगाव: कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील नागरिकांचा अनेक वर्षांपासूनचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याच्या दृष्टीने महत्त्वाची पावले उचलण्यात आली आहेत. गोदावरी डाव्या कालव्यातून ओव्हरफ्लोच्या काळात उपसा सिंचनाद्वारे पाणी उचलण्याच्या प्रस्तावासाठी शुक्रवारी जलसंपदा विभागाकडून प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्यात आले. ही माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली असून, पाण्याच्या आशा पल्लवित झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आमदार आशुतोष काळे यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून पूर्व भागातील पाणीटंचाईचा प्रश्न मांडला होता. त्यानुसार जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत गोदावरी डाव्या कालव्यातून उपसा सिंचनाद्वारे पाणी उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला. त्यानंतर संबंधित विभागाला आवश्यक कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले होते.
त्या अनुषंगाने जलसंपदा विभागाने सर्वेक्षण सुरू केले असून, कालव्यातून पाणी उचलण्याचे तांत्रिक नियोजन आणि त्यासंदर्भातील अहवाल लवकरच शासनाकडे सादर केला जाणार आहे. अहवालानंतर उपसा सिंचनाद्वारे पाणी उपलब्ध करून संबंधित पाणीपुरवठा योजनांचे साठवण तलाव भरले जाणार असून, पूर्व भागातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
या योजनेचा लाभ नाटेगाव, अंचलगाव, पढेगाव, करंजी, ओगदी, कासली, सावळगाव, शिरसगाव, तिळवणी, उक्कडगाव आदी गावांना होणार आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
सर्वेक्षणावेळी गोदावरी डावा तट कालवा उपविभागाचे उपविभागीय अभियंता संदीप पाटील, शाखा अभियंता बी. आर. पवार, प्रशांत सारंगधर, धनेश मंडलिक, सेवानिवृत्त अभियंता तात्यासाहेब थोरात, जिनिंग प्रेसिंगचे संचालक नानासाहेब निकम, संदीप शिंदे तसेच राष्ट्रवादीचे स्थानिक कार्यकर्ते रविंद्र सुंबे, रवींद्र निकम, अंकुश मलिक, बाबासाहेब सुंबे, अशोक भोकरे, अमृत शिंदे आदींसह पूर्व भागातील कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS