बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील हाजीपुर येथे महावितरणच्या कथित निष्काळजीपणामुळे 30 वर्षीय तरुणाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची धक्क

बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील हाजीपुर येथे महावितरणच्या कथित निष्काळजीपणामुळे 30 वर्षीय तरुणाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी महावितरणच्या तीन अधिकारी-कर्मचार्यांविरोधात चकलांबा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (इछड) कलम 105 व 3(5) अंतर्गत गुन्हा क्रमांक 232/2026 दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी मच्छिंद्र एकनाथ उगले (वय 49, रा. हाजीपुर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 4 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी सुमारे 3 वाजता गट क्रमांक 80 मधील त्यांच्या शेतात महावितरणची वीजवाहक नग्न तार जमिनीलगत धोकादायक अवस्थेत लोंबकळत होती. त्याचवेळी त्यांचा मुलगा कृष्णा मच्छिंद्र उगले (वय 30) शेतात काम करत असताना त्याचा विजेभारित तारेला स्पर्श झाला आणि भीषण विजेचा धक्का लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, संबंधित वीजतार धोकादायक असल्याची माहिती यापूर्वीच महावितरणला अनेक वेळा लेखी व तोंडी देण्यात आली होती. तसेच मोबाईलद्वारेही अधिकार्यांशी संपर्क साधून तार दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या प्रकरणी महावितरणचे अभियंता किरण शेळके, कर्मचारी सईद नसरी निगम आणि लाईनमन नारायण मुजाळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा 6 जुलै 2026 रोजी रात्री 8.21 वाजता नोंदविण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. घटनेनंतर हाजीपुर गावात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. ग्रामस्थांनी संबंधित दोषींवर कठोर कारवाई, निलंबन आणि निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपांची सत्यता तपासाअंती स्पष्ट होणार असून, महावितरणकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया प्राप्त झालेली नाही.

COMMENTS