मुंबई: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मलबार हिल शाखेअंतर्गत पश्चिम उपविभागातील शासकीय बंगल्यांच्या देखभाल व दुरुस्ती कामांमध्ये मोठ्या प्रमाण


मुंबई: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मलबार हिल शाखेअंतर्गत पश्चिम उपविभागातील शासकीय बंगल्यांच्या देखभाल व दुरुस्ती कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक अनियमितता झाल्याचे समोर आले आहे. शासकीय बंगल्यांची कोणतीही प्रत्यक्ष कामे न करताच कोट्यवधी रुपयांची बनावट बिले लाटण्याचा प्रताप सेवानिवृत्त उपअभियंता डावखर, शाखा अभियंता दिलीप पाथरोट, विद्यमान उपअभियंता सगरे, तसेच शाखा अभियंते अनिकेत तापकिरे आणि घाटगे या अधिकाऱ्यांनी संगनमताने केल्याचा खळबळजनक आरोप होत आहे.
दैनिक लोकमंथनकडे आलेल्या अधिकृत माहितीनुसार, व्हीव्हीआयपींसाठी असलेल्या सह्याद्री अतिथीगृहावर दाखवण्यात आलेली खर्चाची रक्कम पाहिली तर डोळे पांढरे होण्याची वेळ येते. जितका खर्च या बंगल्यांच्या केवळ डागडुजीवर कागदोपत्री दाखवला गेला आहे, तितक्या रक्कमेत एखादा नवीन आलिशान शासकीय बंगला उभा राहिला असता. त्यामुळे कोणतीही प्रत्यक्ष कामे न करता सरकारी निधीची ही उधळपट्टी करून या अधिकाऱ्यांनी कोट्यवधी रुपये नेमके कोणाच्या खिशात घातले, असा गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहे. प्रत्यक्षात कोणतीही कामे न करता किंवा पूर्वी झालेलीच कामे पुन्हा झाल्याचे कागदावर दाखवून ही बिले हडप केल्याचे पुराव्यांवरून स्पष्ट होत आहे.
या व्हीव्हीआयपी बंगल्यांच्या नावावर झाली लूट
पश्चिम उपविभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या सह्याद्री विश्रामगृह, पुरातन बंगला, अग्रदूत बंगला, नंदनवन बंगला, सातपुडा बंगला, चित्रकुट बंगला, ज्ञानेश्वरी बंगला, रॉयल स्टोन, तोरणा बंगला, मुक्तागिरी बंगला, वर्षा बंगला, जेतवन बंगला आणि शिवनेरी बंगल्यासह इतर सर्व प्रमुख शासकीय निवासस्थानांमध्ये हा गैरप्रकार घडला आहे. या सर्व ठिकाणी एकाच प्रकारची कामे वारंवार दाखवून कोट्यवधी रुपयांचा निधी लाटण्यात आला. विशेषतः सन २०१९-२० आणि २०२२-२३ या कालावधीत करण्यात आलेल्या अनेक कामांची नोंद पुन्हा त्याच स्वरूपात दाखवून दुबार खर्च मंजूर करून घेतल्याचे संबंधित कागदपत्रांवरून उघड झाले आहे. या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची सखोल चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
अभियंता डावखर, पाथरोट, सगरे, तापकिरे, घाटगे यांनी ‘वर्षा’ बंगलाही सोडला नाही?
या संपूर्ण घोटाळ्यात धक्कादायक बाब म्हणजे या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यालाही सोडलेले नाही. ‘वर्षा’ बंगल्यावर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निवासस्थान असतानाच्या काळातही तिथे वारंवार देखभाल-दुरुस्तीचा खर्च दाखवून कोट्यवधी रुपयांची बिले अदा करण्यात आली आणि तो निधी संगनमताने हडप करण्यात आला. याप्रकरणी आता स्वतंत्र चौकशी समिती स्थापन करून सार्वजनिक निधीचा अपव्यय रोखण्यासाठी मोजमापन पुस्तिका (Measurement Book), तपासणी अहवाल आणि बिल मंजुरी प्रक्रियेचा सखोल तपास करावा, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

COMMENTS