बीड : शिवसेनेच्या मशाल चिन्हावर निवडून येऊन मतदारांशी बेइमानी करणारे खासदार हे 'ऑपरेशन लुच्चेगिरी'ला बळी पडल्याची घणाघाती टीका शिवसेना (उद्धव बाळ

बीड : शिवसेनेच्या मशाल चिन्हावर निवडून येऊन मतदारांशी बेइमानी करणारे खासदार हे ‘ऑपरेशन लुच्चेगिरी’ला बळी पडल्याची घणाघाती टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मुख्य महानगरप्रमुख प्रकाश मारावार यांनी केली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात मातोश्री आणि ठाकरे ब्रँडचा प्रभाव कमी करण्यासाठी मशाल चिन्हावर निवडून आलेल्या खासदारांना फोडण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात असल्याचा थेट आरोप त्यांनी केला. ब्लॅकमेलिंग, विविध आमिषे आणि दबावाच्या माध्यमातून या खासदारांना ठाकरे पक्षापासून दूर करण्यात आल्याचे मारावार यांनी स्पष्टपणे म्हटले आहे.
यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांकडून चालवल्या जाणाऱ्या ‘ऑपरेशन टायगर’ या नावावरही कडक शब्दांत भाष्य केले. ते म्हणाले की, ज्या नेत्याने हे अभियान राबवले त्यांनी आधी नारायण राणे यांचा आदर्श घ्यावा. नारायण राणे यांनी जेव्हा शिवसेना सोडली होती, तेव्हा त्यांनी आपल्या सोबतच्या आमदारांसह पदांचे राजीनामे देऊन पुन्हा निवडणूक लढवण्याची हिंमत दाखवली होती. त्याचप्रमाणे मशाल चिन्हावर निवडून आलेल्या या खासदारांनीही आधी आपल्या खासदारकीचे राजीनामे द्यावेत आणि जनतेच्या दरबारात जाऊन पुन्हा निवडून यावे; तेव्हाच त्याला खऱ्या अर्थाने ‘ऑपरेशन टायगर’ म्हणता येईल.
इतरांची पोरे कडेवर घेऊन नाचणे म्हणजे ‘ऑपरेशन लुच्चेगिरी’ आहे. केवळ सहा खासदारांचा गट स्थापन करणे म्हणजे काही ऑपरेशन टायगर नव्हे, अशी तिखट प्रतिक्रिया देत मारावार यांनी, “येणारा काळच कोण टायगर आणि कोण लुच्चा हे ठरवेल,” असे जाहीर आव्हान दिले आहे.

COMMENTS