शिरूर : शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीतील जाचक अटी व शर्ती रद्द करून शेतकऱ्यांना विनाअट सरसकट कर्जमाफी द्यावी, या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळास

शिरूर : शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीतील जाचक अटी व शर्ती रद्द करून शेतकऱ्यांना विनाअट सरसकट कर्जमाफी द्यावी, या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने शिरूर तहसील कार्यालयावर भव्य ट्रॅक्टर रॅली काढून जोरदार निदर्शने करण्यात आली.
विरोधी पक्षनेते तथा आमदार अंबादास दानवे यांच्या आदेशावरून आणि जिल्हा संपर्कप्रमुख परशुराम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन छेडण्यात आले. शिरूर बसस्थानकापासून सुरू झालेली ही ट्रॅक्टर रॅली तहसील कार्यालयावर धडकली. “सातबारा कोरा झालाच पाहिजे”, “जाचक अटी रद्द करा” अशा घोषणांनी कार्यकर्त्यांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख उल्हास गिराम यांनी सरकारवर कडाडून टीका केली. निवडणुकीपूर्वी सातबारा कोरा करण्याचे आश्वासन देणाऱ्या सरकारने सत्तेत आल्यानंतर जाचक अटी लावून शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र रचल्याचा आरोप त्यांनी केला. महायुती सरकारची कर्जमाफी ही निव्वळ फसवणूक असून हा कर्जमाफीऐवजी कर्जवसुलीचा प्रकार असल्याची टीका त्यांनी केली. माजी जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे यांनी, “उद्धव ठाकरे सरकारने शेतकऱ्यांची वेदना समजून विनाअट दोन लाख रुपयांपर्यंत सरसकट कर्जमाफी दिली होती, मात्र विद्यमान सरकार शक्तिपीठ महामार्गासाठी हजारो कोटी खर्च करत असताना शेतकऱ्यांना मात्र अटी घालत आहे,” असे म्हटले. या आंदोलनात उपजिल्हाप्रमुख अजिनाथ खेडकर, तालुकाप्रमुख सोपान मोरे, किसान सेना तालुकाप्रमुख हरी मामा खेडकर यांच्यासह हजारो शिवसैनिक आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

COMMENTS