कोपरगाव : कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाने नागरिकांना वाढीव दराने घरपट्टी दिली असून सध्याची एकूण परिस्थिती पाहता ही करवाढ करणे बिलकुल उचित नाही. याप्र

कोपरगाव : कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाने नागरिकांना वाढीव दराने घरपट्टी दिली असून सध्याची एकूण परिस्थिती पाहता ही करवाढ करणे बिलकुल उचित नाही. याप्रकरणी आपण वैयक्तिकरीत्या लक्ष घालून करवाढ तूर्तास थांबवावी, अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याकडे केली आहे.
जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी कोपरगाव तालुक्यातील अंजनापूर गावाला भेट दिली असता आमदार आशुतोष काळे यांनी मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्नांसह कोपरगावकरांच्या वाढीव घरपट्टीच्या समस्येकडे त्यांचे लक्ष वेधले. ते म्हणाले की, कोपरगाव शहरातील नागरिकांची घरपट्टी वाढवण्याबाबत असंख्य नागरिकांनी आधीच हरकती नोंदविल्या आहेत. मात्र, त्या हरकतींवर अद्याप कोणतीही अधिकृत सुनावणी झालेली नसताना अचानकपणे नगरपरिषद प्रशासनाकडून वाढीव दराने कर वसुली सुरू करण्यात आली आहे.
सध्या महागाईचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून सर्वसामान्य नागरिकांना संसार चालवताना प्रचंड आर्थिक ओढाताण करावी लागत आहे. अशा परिस्थितीत वाढीव घरपट्टीमुळे नागरिकांच्या अडचणी आणखी वाढणार आहेत. त्यामुळे कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास जगताप यांना ही वसुली थांबवण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी आमदार काळे यांनी केली. या मागणीला जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनीही उपमुख्याधिकारी मनोजकुमार पापडीवाल यांना निवेदन देऊन विशेष सर्वसाधारण सभा बोलावण्याची आणि जुन्या पद्धतीनेच कर आकारणी करण्याची मागणी केली आहे.

COMMENTS