श्रीगोंदा : शहरातील घनकचरा व्यवस्थापनाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचे प्रकल्प उभारण्यात आले, मात्र प्रत्यक्षात एकही प्रकल्प प्रभावीपणे कार्यान्वि

श्रीगोंदा : शहरातील घनकचरा व्यवस्थापनाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचे प्रकल्प उभारण्यात आले, मात्र प्रत्यक्षात एकही प्रकल्प प्रभावीपणे कार्यान्वित नसल्याची धक्कादायक परिस्थिती समोर आली आहे. श्रीगोंदा नगरपरिषदेचे घनकचरा व्यवस्थापन केंद्र हे नदीच्या बेटावर उभारण्यात आले असून, त्यामुळे भविष्यात मोठ्या प्रमाणात पाणी प्रदूषण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
घनकचरा डेपो परिसरात कचरा प्रक्रिया करण्यासाठी विविध मशिनरी बसविण्यात आली होती, मात्र सध्या ही सर्व यंत्रणा पूर्णपणे बंद अवस्थेत आहे. मोठा गाजावाजा करून सुरू केलेला गांडूळ खत प्रकल्प केवळ कागदोपत्रीच उरल्याचे चित्र आहे. दरम्यान, न कुजणारा कचरा टाकण्यासाठी मोठे शेततळे उभारण्याचे काम सुरू असून, या माध्यमातून निधी लाटण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. या नव्या तलावातील कचऱ्यामुळे नदीतील पाणी दूषित होण्याची शक्यता बळावली आहे.
याच ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहातील मैला टँकरद्वारे आणून, त्यावर प्रक्रिया करून पाणी शुद्ध करणारा प्रकल्प उभारण्यात आला होता. मात्र, हा प्रकल्पही बंद पडून यंत्रणा धूळखात पडली आहे. सुरक्षेसाठी बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत, कचऱ्याचे मोजमाप होत नाही आणि जंतुनाशक फवारणीअभावी परिसरात दुर्गंधी पसरली आहे. पूर्वी कचरा कुजवण्यासाठी बांधलेले १७ हौद आणि वर्गीकरणाचे ग्राउंडही देखभालीअभावी उद्ध्वस्त झाले आहे. नगरपरिषदेच्या या ढिसाळ कारभारामुळे घनकचरा डेपो परिसरातील समस्या दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालली आहे. होत असून, भविष्यात नदीचे पाणी प्रदूषित झाल्यास त्याचा मोठा फटका परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला बसू शकतो. त्यामुळे संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष घालून दोषींवर कारवाई करावी व बंद पडलेले प्रकल्प त्वरित सुरू करावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

COMMENTS