देशभर गाजत असलेल्या ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे नांदेडपर्यंत पोहोचल्यानंतर राज्यातील शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. विद्यार्थ्यांच
देशभर गाजत असलेल्या ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे नांदेडपर्यंत पोहोचल्यानंतर राज्यातील शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणार्यांना कोणतीही माफी देऊ नये, अशी भावना आता समाजातून व्यक्त होत असून, रेणुकाई करिअर सेंटर (आरसीसी)चे संचालक मोटेगावकर यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी तीव्र झाली आहे. युवा रोजगार परिषदेचे अध्यक्ष कलमूर्गे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना मोटेगावकर यांच्यावर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करून आरसीसी क्लासेस कायमचे बंद करावेत, तसेच राज्यातील सर्व मोठ्या कोचिंग क्लासेसची सीबीआयमार्फत सखोल चौकशी करण्यात यावी, अशी जोरदार मागणी केली.
नीट पेपरफुटी प्रकरणातील मुख्य सूत्रधार मानले जाणारे प्रा. पी. व्ही. कुलकर्णी याला सीबीआयने पुण्यातून अटक केल्यानंतर तपासाचे धागेदोरे नांदेडमधील आरसीसी संस्थेपर्यंत पोहोचल्याचा दावा समोर आला आहे. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, मोटेगावकर यांच्या मोबाईलमध्ये फुटलेल्या प्रश्नपत्रिकांशी संबंधित माहिती आढळल्याचे सांगितले जात आहे. तसेच पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (इछड), भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आणि सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक कायद्यान्वये गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कलमूर्गे यांनी या प्रकरणाला विद्यार्थ्यांच्या विश्वासाचा आणि कष्टाचा खून असे संबोधत संताप व्यक्त केला. दरवर्षी लाखो विद्यार्थी आणि पालक मोठ्या विश्वासाने कोचिंग संस्थांकडे पाहतात. अनेक कुटुंबे कर्ज काढून मुलांना नीट आणि जेईईसारख्या स्पर्धा परीक्षांसाठी प्रवेश देतात. मात्र काही संस्थांनी पैशाच्या हव्यासापोटी संपूर्ण शिक्षण व्यवस्थेलाच काळिमा फासण्याचे काम केले आहे, असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की, मागील अनेक वर्षांपासून पेपरफुटी आणि गैरप्रकारांचे जाळे कार्यरत असल्याचा संशय आहे. त्यामुळे केवळ एका प्रकरणापुरती चौकशी मर्यादित न ठेवता मागील पाच वर्षांतील सर्व व्यवहार, विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया, निकालातील अनियमितता आणि संबंधित आर्थिक व्यवहारांची तपासणी करण्यात यावी. या प्रकरणात सहभागी असलेल्या शैक्षणिक दलाल, अधिकार्यांपासून ते कोचिंग नेटवर्कमधील सर्व संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली. नीट परीक्षा रद्द झाल्यानंतर मानसिक तणाव, नैराश्य आणि भविष्याबाबतची भीती यामुळे काही विद्यार्थ्यांनी टोकाची पावले उचलल्याच्या घटनांकडे लक्ष वेधत सरकारवरही टीका केली. विद्यार्थ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करणार्यांची संपत्ती जप्त करून आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे या प्रकरणातील संशय आणखी गडद झाला आहे. या व्हिडीओमध्ये संस्थेचे प्रमुख विद्यार्थ्यांना सराव परीक्षेतील किती प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेत आले? असा प्रश्न विचारताना दिसत आहेत. विद्यार्थ्यांकडून होकारार्थी प्रतिसाद मिळाल्यानंतर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात चर्चेत आला असून, तपास यंत्रणांनी त्याचीही दखल घेतल्याचे समजते. 1999 मध्ये अवघ्या दहा विद्यार्थ्यांपासून सुरू झालेल्या आरसीसी संस्थेने आज राज्यातील विविध जिल्ह्यांत मोठे जाळे उभे केले आहे. दरवर्षी अंदाजे 40 हजार विद्यार्थी नीट आणि जेईई परीक्षांसाठी येथे प्रवेश घेत असल्याचे सांगितले जाते. प्रति विद्यार्थी 50 ते 65 हजार रुपये शुल्क आकारणार्या या संस्थेची वार्षिक उलाढाल 100 कोटी रुपयांहून अधिक असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाने केवळ नांदेडच नव्हे तर राज्यातील संपूर्ण कोचिंग उद्योगावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

COMMENTS