गुवाहाटी : गुवाहाटी येथे मंगळवारी पार पडलेल्या भव्य शपथविधी सोहळ्यात हिमंता बिस्वा सरमा यांनी सलग दुसर्यांदा आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली

गुवाहाटी : गुवाहाटी येथे मंगळवारी पार पडलेल्या भव्य शपथविधी सोहळ्यात हिमंता बिस्वा सरमा यांनी सलग दुसर्यांदा आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. खानापारा येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह तसेच भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विविध राज्यांतील मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्र्यांची उपस्थिती होती.
मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यासोबत चार आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यात भाजपचे रामेश्वर तेली आणि अजंता नेओग, तर मित्रपक्षांच्या वतीने अतुल बोरा आणि चरण बोरो यांचा समावेश होता. या नव्या मंत्रिमंडळाकडे राज्याच्या विकासाच्या अपेक्षेने पाहिले जात आहे. शपथविधी सोहळ्यासाठी राज्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहिले होते. आसाम भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप सैकिया यांनी हा सोहळा राज्यासाठी ऐतिहासिक क्षण असल्याचे सांगत लाखो नागरिकांच्या उपस्थितीचा उल्लेख केला. कार्यक्रमस्थळी मुख्यमंत्री सरमा यांचे कुटुंबीयही उपस्थित होते. त्यांच्या पत्नी रिंकी भुयान यांनी हा अत्यंत आनंदाचा क्षण असल्याची भावना व्यक्त केली, तर मुलगी सुकन्या सरमा यांनी सोहळ्याबद्दल आनंद व्यक्त केला.
दरम्यान, विविध राज्यांतील नेत्यांनी हिमंता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी आसामच्या विकासाला नव्या गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनीही राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कार्य करेल, असे म्हटले. आसाममध्ये पुन्हा सत्तेवर आलेल्या या नेतृत्वामुळे आगामी काळात विकास, पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक यांना अधिक चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

COMMENTS