ढाका ः बांगलादेशातील तेराव्या संसदीय निवडणुकीत बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने लक्षणीय यश संपादन करत 213 जागांवर विजय मिळवला आहे. पक्षाध्यक्ष तारिक र

ढाका ः बांगलादेशातील तेराव्या संसदीय निवडणुकीत बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने लक्षणीय यश संपादन करत 213 जागांवर विजय मिळवला आहे. पक्षाध्यक्ष तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखाली मिळालेल्या या निकालाने देशातील राजकीय पटावर मोठे परिवर्तन घडवले आहे. सत्तांतरानंतर शेजारी राष्ट्रांशी संबंधांविषयी काय भूमिका घेतली जाईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना भारताशी संबंध सुधारण्याचे संकेत पक्षाकडून देण्यात आले आहेत.
निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तारिक रहमान यांचे अभिनंदन केले. त्यानंतर पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या प्रतिक्रियांमधून द्विपक्षीय संबंध अधिक सकारात्मक दिशेने नेण्याची तयारी दिसून आली. स्थायी समितीचे सदस्य नजरुल इस्लाम खान यांनी दोन्ही देशांतील ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आर्थिक नातेसंबंध अधिक दृढ करण्याची आशा व्यक्त केली. लोकशाही प्रक्रियेला भारताने दिलेल्या मान्यतेचे त्यांनी कौतुकही केले. पक्षाच्या प्रसार विभागाशी संबंधित सयरुल कबीर खान यांनीही भारतासह विविध देशांच्या नेत्यांकडून आलेल्या शुभेच्छांचे स्वागत केले. बांगलादेशच्या हिताला केंद्रस्थानी ठेवून मैत्रीपूर्ण आणि परस्पर सन्मानावर आधारित संबंध वृद्धिंगत करण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या माध्यमातून देशाच्या विकास आराखड्याला चालना देणे हेच पक्षाध्यक्षांनी ठरवलेल्या धोरणाचे ध्येय असल्याचे त्यांनी नमूद केले. विजयानंतर दिलेल्या निवेदनात पक्षाने संयम राखण्याचे आवाहन केले. दीर्घकाळ चाललेल्या राजकीय संघर्षात अनेक कार्यकर्त्यांनी दिलेल्या बलिदानाचा सन्मान राखणे ही नैतिक जबाबदारी असल्याचे सांगण्यात आले.

COMMENTS