Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रेल्वे अपघातात चार प्रवाशांचा मृत्यू ; मुब्र्यांजवळ रेल्वेतून पडल्याने घटना

मुंबई : मध्य रेल्वेच्या दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान सीएसएमटीकडे जाणार्‍या जलद लोकलमधून सोमवारी सकाळी 8 प्रवासी खाली पडल्याने मोठी दुर्घटना घडली.

खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी
अवकाळी पाऊस, गारपिटीच्या मदतीपोटी लातूर जिल्ह्यातील 22 हजार शेतकर्‍यांसाठी 10 कोटी
आगडगाव : भैरवनाथ देवस्थानजवळ रविवारी दीड हजार किलो आंब्यांचा रस
Mumbai LocalAccident mumbai lucknow train five passenger falls to death

मुंबई : मध्य रेल्वेच्या दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान सीएसएमटीकडे जाणार्‍या जलद लोकलमधून सोमवारी सकाळी 8 प्रवासी खाली पडल्याने मोठी दुर्घटना घडली. या घटनेत आतापर्यंत 4 प्रवाशांचा मृत्यू झाला असून इतर जखमी प्रवाशांवर ठाणे सामान्य रुग्णालय आणि छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार दुर्घटनाग्रस्त प्रवासी दरवाज्यांवर लटकून प्रवास करत होते. या प्रवाशांपैकी काहीजण ट्रेनच्या वळणावर विरुद्ध दिशेने जाणार्‍या दुसर्‍या गाडीतील प्रवाशांचा धक्का लागून ही दुर्घटना झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील निला यांनी यासंदर्भात सांगितले, ही गाडींची थेट धडक नव्हती. दोन विरुद्ध दिशेने जाणार्‍या ट्रेनच्या पायर्‍यांवर लटकलेले प्रवासी एकमेकांमध्ये अडकल्याने ही घटना घडली, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. ट्रेन वळणावर असताना एका बाजूला झुकते, त्यामुळे दोन ट्रेनमधील अंतर कमी होण्याची शक्यता असते. हे देखील एक संभाव्य कारण असू शकते. रेल्वे प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी हजर राहून मदतकार्य केले, अपघाताची चौकशी सुरू आहे. सकाळी कामावर निघालेल्या प्रवाशांची यामुळे गैरसोय झाली. मुंब्रा हे ठाण्याच्या उपनगरातील एक अतिगर्दीचे आणि वर्दळीचे स्थानक असून, अशा दुर्घटनांची शक्यता नेहमीच निर्माण होते. या पार्श्‍वभूमीवर रेल्वे प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबईसाठी तयार होणार्‍या सर्व नव्या गाड्यांमध्ये स्वयंचलित दरवाज्यांची यंत्रणा तयार करत आहे. तसेच, सध्या वापरात असलेल्या लोकल डब्यांचेही डिझाईन बदलून त्यात दरवाजे आपोआप बंद होण्याची सुविधा जोडण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांचे चौकशीचे आदेश
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ चौकशी करण्याच्या सूचना दिल्या असून अपघातात ज्या 4 जणांचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या कुटूंबीयांना मदत म्हणून आम्ही 5 लाख रुपये जाहीर केले आहेत. याशिवाय जखमींना 50 हजार, एक लाख किंवा दोन लाख रुपये दिले जातील. तसेच त्यांचा सर्व उपचार शासनाच्या माध्यमातून केला जाईल. याशिवाय ज्युपिटरला जे दोन रुग्ण गंभीर आहेत, त्यांचा सर्व खर्च शासन करेल, अशी माहिती गिरीश महाजन यांनी दिली आहे.

वाढती गर्दी अपघाताचे मुख्य कारण ः खा. शरद पवार
मध्य रेल्वेच्या दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान ट्रेनमधून पडून प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. सर्व निष्पाप प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. तसेच, काही प्रवाशांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्याही प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना करतो. मध्य रेल्वेवर दररोज सरासरी 6 ते 7 प्रवाशांचा लोकलमधून पडून मृत्यू होतो. एका आकडेवारीनुसार समोर आलेली ही माहिती अत्यंत चिंताजनक आहे. लोकल ट्रेन्समधील वाढती गर्दी याचे मुख्य कारण असल्याचं सर्वज्ञात आहे. तरीही, असे अपघात घडल्यानंतर प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही. केंद्रीय रेल्वे प्रशासनाने या दुर्दैवी घटनेची गांभीर्याने दखल घ्यायला हवी, महत्वांच्या मार्गांवर लोकल फेर्‍या वाढवणं गरजेचे असल्याचे मत खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.

COMMENTS