नगर तालुक्यातील आदर्श गाव हिवरे बाजारने लोकसहभागातून साधलेला सर्वांगीण विकास अन्य गावांसाठी प्रेरणादायी आहे.
अहमदनगर/प्रतिनिधी-नगर तालुक्यातील आदर्श गाव हिवरे बाजारने लोकसहभागातून साधलेला सर्वांगीण विकास अन्य गावांसाठी प्रेरणादायी आहे. दुष्काळ मुक्तीची या गावाची चळवळ देशातील तरुणाईला प्रोत्साहन देणारी आहे, असे गौरवोदगार आमदार सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले.
आमदार खोत यांनी नुकतीच आदर्शगाव हिवरे बाजारला भेट दिली. यावेळी त्यांनी गावातील विविध विकास कामांची पहाणी करून माहिती घेतली. आदर्श गाव योजना समितीचे अध्यक्ष व गावचे उपसरपंच पोपटराव पवार यांनी हिवरे बाजारमध्ये केलेल्या कामाविषयी सविस्तर माहिती त्यांना दिली. यावेळी बोलताना आमदार खोत पुढे म्हणाले, दुष्काळमुक्तीचा हिवरे बाजारचा संदेश देशातील तरुणाईने घेतल्यास मोठी चळवळ निर्माण होईल. दुष्काळमुक्त गाव, हिरवळीने नटलेले गाव, व्यसनमुक्त गाव, विकासाभिमुख गाव यातून जणू पृथ्वीवर स्वर्ग अवतरावा असे गाव निर्मितीचे काम एक तपस्वीच करू शकतो. हे गाव व गावाचा विकास पाहिल्यानंतर गावाला समृद्ध करणारे पोपटराव पवार यांच्या व्यक्तीमत्वाच्या प्रेरणेतून लाखोजण तयार होतील आणि समृध्द भारत व बलशाली भारत निर्माण होऊन या देशाला प्रगतीपथावर नेणारे युवक निर्माण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी हिवरे बाजार ग्रामस्थांतर्फे खोत यांचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला.यावेळी एस.टी.पादीर, ग्रामपंचायत सदस्य रो.ना.पादीर व ग्रामस्थ उपस्थित होते.
COMMENTS