HomeUncategorized

कराड तालुक्यातील किल्ले वसंतगडच्या बुरूजांचे दुर्गार्पण सोहळा

कराड / प्रतिनिधी : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष व हजारो मावळ्यांच्या बलिदान, त्यागाचे जिवंत स्मारक असणा

प्रकाश हॉस्पिटलमध्ये 120 महिलांची मोफत शस्त्रक्रिया
पोकलेनचे ऑईल पंप चोरणार चोरटा नाशिक ताब्यात
संविधान अमृत महोत्सव वर्षानिमित्ताने संविधान दिंडीचे आयोजन

कराड / प्रतिनिधी : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष व हजारो मावळ्यांच्या बलिदान, त्यागाचे जिवंत स्मारक असणार्‍या कराड तालुक्यातील ऐतिहासिक किल्ले वसंतगडावरील नाईकबा दरवाजाजवळील बुरूंजाचे नुकतेच दुर्गार्पण करण्यात आले.
राज्य पुरातत्व खात्याच्या निकषानुसार, 350 वर्षानंतर चुन्याचा घाणा कार्यान्वित करत चुनखडीमध्ये बांधकाम करण्यात आले आहे. याप्रसंगी बुरुजाचे दुर्गार्पणासाठी परिश्रम घेणार्‍या सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तान व टीम वसंतगडच्या दुर्गसवेकांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय शिवाजीजय भवानी असा जयघोष करत जल्लोष केला.
अतिवृष्टी आणि 350 वर्ष ऊन, वारा, पाऊस अंगावर झेलणार्‍या कराड तालुक्यातील ऐतिहासिक किल्ले वसंतगड येथील नाईकबा दरवाजाजवळील बुरूज गेल्या काही दिवसापूर्वी ढासळला होता. किल्ले वसंतगड संवर्धनासाठी धडपडणार्‍या टीम वसंतगडने ही बाब सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या दुर्गसेवकांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर या बुरूजांच्या पुर्नउभारणीसाठी दोन्ही दुर्ग संवर्धन संस्थांनी एकत्र येण्याचे निश्‍चित केले होते.
त्यानुसार मागील वर्षी जून महिन्यात राज्य पुरातत्व खात्याकडून सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानला या बुरूजांची पुर्नबांधणी करण्यास मान्यता मिळाली होती. दि. 24 जून रोजी साध्या पध्दतीने या कामाचा शुभारंभ करण्यात आला. या बुरूजांच्या पुर्नउभारणीसाठी अपेक्षित असलेला साडेआठ लाखांचा खर्च पावसाळा संपल्यानंतर बुरूज संवर्धनासह पुर्नउभारणीच्या कामास प्रत्यक्षात सुरूवात करण्यात आली.
14 डिसेंबर रोजी या कामासाठी आवश्यक चुनखडी तयार करण्यासाठी गडावरील चुन्याचा घाणा कार्यान्वित करण्यात आला. त्यानंतर बुरजाच्या पुर्नबांधणीच्या कामास गती आली. महिनाभरात हे काम पूर्णत्वास गेले. काम सुरू असताना आणि प्रत्यक्षात काम सुरू होण्यापूर्वी टीम वसंतगडच्या मावळ्यांनी खूप परिश्रम घेतले. त्यास सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या सातारा जिल्ह्यातील दुर्गसवेकांनी सहाय्य केले.
बुरजांचे काम पूर्णत्वास गेल्यानंतर रविवार, दि. 16 जानेवारी रोजी छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधत या बुरूजांच्या कामाचे दुर्गार्पण करण्यात आले. प्रारंभी मोजक्या मान्यवरांसह दुर्गसेवकांच्या उपस्थितीत गडावरील चंद्रसेन मंदिरात छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर दुर्गसेवकांच्या उपस्थितीत चंद्रसेन मंदिरापासून नाईकबा दरवाजाजवळील पुर्नबांधणी केलेल्या बुरजांपर्यंत पालखी मिरवणूक काढण्यात आली.
भंडार्‍याची उधळण करत छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, जय शिवाजी जय भवानी असा जयघोष करण्यात आला. दुर्गसेवकांसह मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून बुरूंजाचे दुर्गार्पण करण्यात आले. सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तान ही दुर्ग संस्था राज्यभरातील दुर्ग संवर्धनासाठी अग्रेसर असते. दुर्ग संवर्धन कार्यास प्राधान्य देत आजवर सह्याद्री प्रतिष्ठानने किल्ले राजगड तसेच अन्य काही किल्ल्यांवर दुर्ग संवर्धनाचे मोठे कार्य केले आहे.

COMMENTS