राजकारणातील घराणेशाही

Homeताज्या बातम्यासंपादकीय

राजकारणातील घराणेशाही

लोकशाहीसंपन्न देशात मतदार राजा हा सार्वभौम असून, तो पाच वर्षांत या लोकशाहीचा राजा कोण असणार, हे ठरवत असला तरी, वर्षानुवर्षे अनेक घराणी राजकारणांत प्र

आरटीईच्या शिक्षणाचा खेळखंडोबा
विषवृल्लीला पोसणारे कोण ?
दिल्ली पोलिसांची दमनशाही

लोकशाहीसंपन्न देशात मतदार राजा हा सार्वभौम असून, तो पाच वर्षांत या लोकशाहीचा राजा कोण असणार, हे ठरवत असला तरी, वर्षानुवर्षे अनेक घराणी राजकारणांत प्रस्थापित होतांना दिसून येत आहे. या राजकीय घराण्यांनी आपली सत्ता आणि सिद्दी काय ठेवण्याची महत्वाकांक्षा बाळगत नेहमीच नवीन नेतृत्वाचा उदय होऊ दिला नाही. केवळ सत्ता उपभोगत संस्था, कारखाने आपल्या ताब्यात ठेवत प्रस्थापित होण्याचा प्रयत्न केला. पिढयांनपिढया सत्ता उपभोगली. महाराष्ट्रातील हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच घराण्यांनी राज्याच्या राजकारणांत सत्ता उपभोगली. परिणामी लोकशाही देशात सत्ता एकाच वर्गाकडे सीमित राहिली. ती कधी झिरपत सर्वसामान्यांकडे आलेली नाही. त्यामुळे विकास हा एका वर्गांचा होतांना दिसून येत येतो.
महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात दोन-तीन कुटुंबाची मक्तदारी पाहायला मिळते. मुंबईत ठाकरे कुटुंबियांची तिसरी पिढी, शरद पवार यांची तिसरी पिढी, सांगलीत वसंतदादा पाटील यांची तिसरी पिढी, सातार्‍यात भोसले घराणे (पिढी सांगणे कठीण), सोलापुरात मोहितेंची तिसरी पिढी, सुशीलकुमार शिदे यांची दुसरी पिढी, अहमदनगरमध्ये विखेंची तिसरी पिढी, थोरात, राजळे, ढाकणे, गडाख, घुलेंची दुसरी पिढी, कोल्हापुरात मंडलिक, महाडिक, माने यांची दुसरी पिढी, नाशिकमध्ये भुजबळांची दुसरी पिढी, भाऊसाहेब हिरेंची तिसरी पिढी, जळगावात जैनांची दुसरी, विदर्भात नाईकांची दुसरी पिढी, तर मराठवाडयात शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख यांची दुसरी पिढी, गोपीनाथ मुंडेंची दुसरी पिढी, कोकणात शेकापच्या पाटील घराण्याची तिसरी पिढी, नारायण राणेंची दुसरी पिढी, अमरावतीत माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची दुसरी पिढी, मुंबई-ठाणे पट्टयात गणेश नाईक, प्रकाश परांजपे यांची दुसरी पिढी, अशी कितीतरी घराणी महाराष्ट्राच्या राजकारणांत आपले सत्तास्थान राखून आहेत. सत्तेसाठी कधी या पक्षांत तर कधी त्या पक्षात जावून आपले मतदारसंघ शाबूत राखण्याचे प्रयत्न या राजकीय पिढयांनी कायम केले आहे. राजकारणांतील पक्ष उडयाबरोबरच यांचे एकमेकांत होणारे विवाह, नातेवाईंकाचा गोतावळा, यामुळे सत्ता या घराण्यांपर्यंत मर्यादित राहिली. ती कधीही सर्वसामान्यांपर्यंत झिरपू शकली नाही. परिणामी महाराष्ट्राच्या राजकारणांत नवीन नेतृत्वाचा विकास खुंटल्यांचे दिसून येते. कधी नवीन नेतृत्व उदयास येऊ लागले, की ही राजघराणी ते नेतृत्व चिरडण्याचे किंवा, स्वअंकित करण्याचे काम करतांना दिसून येते.
महाराष्ट्रातील राजकीय घराणेशाहीचा प्रमुख आधार म्हणजे सहकारी संस्था. प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात या सहाकरी संस्था, पतपेढीवर या घराण्यांची मक्तेदारी कायम आहे. आज या सहकारी संस्थाची अवस्था अत्यंत बिकट आहे. कारण याच सहकारी संस्थांच्या जोरावर आपले प्रस्थ निर्माण करणार्‍यांना घराण्यांनी कधीही नाविण्यपूर्ण बदल केले नाहीत, किंवा विकास कधीही इतरांपर्यंत झिरपू दिला नाही. मात्र कधीकाळी याच सहकारामुळे महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थकारणात बदलाचे वारे वाहू लागले. त्या प्रक्रियेत सामील झालेल्यांची एक नवी पिढी नवनेतृत्व म्हणून उदयाला आली. त्यापकी अनेकांना सत्तेची कौटुंबिक पाश्वभूमी नव्हती. या नेतृत्वाने सूतगिरण्या, बँका, पतसंस्था, उपसा जलसिंचन योजना, खरेदी-विक्री संघ, पाणीवाटप संस्था, साखर कारखाने इत्यादी संस्थांच्या माध्यमातून राजकीय भरतीची वीण तयार केली. संस्थेची स्थापना करणार्‍यांकडे मुख्य नेतृत्व राहिले. बाकी विश्‍वासूंना दुय्यम सत्तापदांवर समाधान मानावे लागले. पुढे याच नेतृत्वाने तालुक्याच्या राजकारणात हात घातला. कारखान्यांचे कार्यक्षेत्र किमान तालुकाभर असतेच. म्हणजेच कारखान्याच्या माध्यमातून विधानसभेला पूरक वातावरण तयार करण्यात आले. ज्यांनी लोकांच्या सत्यनारायणाच्या पूजेपासून शुभविवाहापर्यंत आणि शेतीतल्या बांधाच्या भांडण-मारामारीपासून एखाद्याच्या अंत्यविधीपर्यंत सुख-दु:खात सामील होणे पसंत केले, त्यांना लोकांनी डोक्यावर घेतले. अशा घराण्यांकडे सर्व साधनांची चांगली यंत्रणा असते. लग्नसराईत या घराण्यांतील लोक वेगवेगळ्या लग्नांना हजर राहतात. एका अर्थाने भावनेचे राजकारण या घराण्यांना करता येते म्हणूनही त्यांच्याबद्दलचे प्रेम वाढते. अंगभूत नेतृत्वगुणांबरोबर राजकारण-समाजकारण करण्यासाठी जे व्यापक समजुतीचे चाणाक्षपण लागते, ते असलेली राजकीय घराणी टिकून आहेत. मात्र या राजकीय घराण्यांचा सत्तेला सुरुंग लावण्याचा प्रयत्न म्हणावा तितकासा झालेल्याचे दिसून येत नाही.

COMMENTS