देवळाली प्रवरा गावात चोरट्यांनी फोडली आठ घरे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देवळाली प्रवरा गावात चोरट्यांनी फोडली आठ घरे

दीड लाखावर ऐवजाची केली लूट, रात्रीच्या गस्तीसाठी अवघा एक पोलिसदेवळाली प्रवरा/प्रतिनिधी-राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा शहरात शनिवारी रात्री दहा ते

आणखी एक बडा सावकार कर्जत पोलिसांच्या जाळ्यात
शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी काँग्रेस पक्ष सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी – ना. बाळासाहेब थोरात
भाडोत्री दिलेली रिक्षा पळवली

दीड लाखावर ऐवजाची केली लूट, रात्रीच्या गस्तीसाठी अवघा एक पोलिस
देवळाली प्रवरा/प्रतिनिधी-राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा शहरात शनिवारी रात्री दहा ते पंधरा चोरांच्या टोळक्याने आठ ठिकाणी घरफोडी करुन सोने, चांदीसह रोख रक्कम असा एकुण 1 लाख 70 हजाराचा ऐवज लुटून नेला. राहुरीचे पोलिस निरीक्षक सुटीवर जाताच चोरट्यांनी देवळाली प्रवरात रात्रभर धुमाकूळ घातला. त्यामुळे रात्रीच्या गस्तीवरील पोलिस कुठे होते असा प्रश्‍न पुढे येत आहे. 50 हजार लोकसंख्या असलेल्या या शहरात रात्रीच्या गस्तीवर अवघ्या एका पोलिसाची नेमणूक केली जाते. गावात पोलिस चौकी असून अडचण, नसून खोळंबा अशी अवस्था झाली आहे. दरम्यान, या घरफोड्यांबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल करून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

देवळाली प्रवरा शहरात शनिवारी रात्री ते रविवारी पहाटेपर्यंत दहा ते पंधरा जणांच्या चोरट्यांच्या टोळीने रात्रभर धुमाकूळ घातला. रात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास सेवानिवृत्त शिक्षक अच्युत नांदुर्डीकर यांच्या बंद बंगल्याचे कुलूप तोडून बंगल्यातील कपाटे व सामानाची उचकापाचक करुन मोठा ऐवज नेला असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. नांदुर्डीकर सध्या त्यांच्या मुलीकडे वास्तव्यास आहेत. चोरी झाल्यानंतर दुपारी 3 वाजेपर्यंत उपस्थित न झाल्याने नेमका किती ऐवज गेला, हे समजू शकले नाही. चोरट्यांनी त्यांच्या शेजारील बंद बंगल्याचे कुलूप तोडून बंगल्यात प्रवेश केला पण चोरट्यांची तेथे निराशा झाली. काही महिन्यापूर्वीच बंगल्याचे मालक सेवानिवृत्त शिक्षक विलास पवार हे लाख (ता.राहुरी) शेतात राहण्यासाठी गेले. त्यामुळे त्यांच्या बंगल्यात चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. या बंगल्यापासून जवळच असलेल्या सोमनाथ पठारे यांच्या बंगल्याकडे नंतर चोरट्यांनी मोर्चा वळविला. पठारे हे शनिवारी सकाळी कुटुंबासह पुणे येथे गेले होते. पुण्यावरून ते कोल्हापूर येथे जाणार होते. पठारे यांच्या बंगल्यात चोरट्यांनी उचकापाचक करुन व सामानाचा ढीग घालून ठेवला होता. कपाटातील सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तू व रोख रक्कम असा एकूण 70 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी येथून चोरुन नेला. पठारे यांच्या बंगल्यातील टाँयलेटचा वापर यावेळी चोरट्यांनी केला. यानंतर चोरट्यांनी अमित सुरेश अंबिलवादे यांच्या सोन्याच्या दुकानाची कुलपे तोडून दुकानातील 750 ग्रँम चांदी व दुरुस्तीसाठी आलेले दागिने असा एकूण एक लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला. तसेच शेजारीच राहणार्‍या शिरीष लोखंडे या शिक्षकाच्या बंद घराचे कुलूप तोडून मोठा ऐवज नेला असण्याच्या शक्यता वर्तविली जात आहे. हे शिक्षक दाम्पत्य सुपा येथील घरी गेले असल्याने नेमका किती ऐवज गेला, हे समजू शकले नाही. या दुकानात चोरी करण्यापूर्वी कटारिया यांच्या बंगल्याच्या गेटमधून बॅटरी लावून त्यांनी पाहिले. त्याच वेळी कटारिया यांच्या किराणा दुकानासमोर आठ ते दहा चोरटे उभे असल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले. पाठीवर सॅक लटकवलेल्या व तोंडाला काळे फडके बांधलेल्या अवस्थेत हे चोरटे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहेत.

आरडाओरड व पाठलाग
या ठिकाणाहून खांदे गल्लीतील आनंद देसर्डा यांच्या साई आनंद किराणा या दुकानाची कुलुपे तोडीत असताना जवळच असलेल्या काका मिसाळ यांनी घराच्या छतावरुन पाहिले. मिसाळ यांनी संतोष मुथ्था यांना फोन करुन दुकान फोडीत असल्याची माहिती दिली. मुथ्था यांनी आनंद देसर्डा यांना फोन करुन चोरीची माहिती दिली. देसर्डा यांनी दुकानाकडे धाव घेतली. त्यावेळी चोरटे दुकानाचे सेंटर लॉक उघडीत होते. देसर्डा यांनी मोठमोठ्याने आरडाओरड केल्याने चोरट्यांनी काढता पाय घेतला. यावेळी देसर्डा यांना चार ते पाच चोरटे दुकानामागील शेतात पळून गेल्याचे दिसले. चोरट्यांनी मग शेतातील निवृत्ती खांदे यांच्या घराकडे मोर्चा वळवला. घराच्या मागील दरवाजाचे कुलूप तोडून घरातील कपाटांची उचकापाचक करून कपाटातील 3 हजार रुपये रक्कम चोरट्यांनी चोरुन नेली. त्यानंतर चोरट्यांनी श्रीरामपूर रस्त्यालगत रेणुका पंपाजवळील मगबुल गफुर पटेल यांच्या घराची आतील बाजूने लावलेली कडी गजाच्या साह्याने उघडून पटेल झोपलेल्या पलंगास वेढा दिला. हातात हत्यारे व एकाच्या हातात पिस्तुल असल्याचे त्यांनी पाहिले. चोरट्यांनी हिंदी भाषेतून कपाटाच्या चाव्या मागितल्या. कपाट उघडेच आहे असे सांगितल्यावर दोन चोरट्यांनी कपाटाची उचकापाचक केली, 15 हजाराची रोख रक्कम त्यांच्या हाती लागली. चोरट्यांनी चोरी करण्यापूर्वी पटेल यांचा मुलगा अमजद ज्या खोलीत झोपला होता, त्या खोलीच्या दरवाजाची बाहेरून कडी लावून घेण्यात आली होती. घरात कोणीतरी शिरल्याचा संशय आल्याने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न अमजद याने केला, परंतु दरवाजा बाहेरुन लावलेला असल्याने अमजद याने शेजारी राहणारे युनूस शेख यांना फोन लावून चोरांची माहिती दिली. शेख व त्यांचे दोन बंधू बाहेर आले व चोरांच्या मागे पळू लागले असता चोरट्यांनी त्यांच्यावर दगडाचा वर्षाव केला. अचानक दगड समोर पडू लागल्याने शेख बंधू मागे फिरले. चोरटे श्रीरामपूर रस्त्याने चव्हाण वस्तीकडे पळाले. त्या ठिकाणी चोरट्यांचा टेंपो उभा होता.

श्‍वानाने काढला माग, पण…
देवळालीत अनेक ठिकाणी चोरट्यांनी घरफोड्या केल्यानंतर सकाळी ठसेतज्ञ पथकास पाचारण करण्यात आले होते. ठसेतज्ञ प्रमुख पांडुरंग फंड व पोलिस कॉन्स्टेबल एम. आर. खरपुडे यांनी घरफोडीच्या ठिकाणी ठसे शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु चोरट्यांनी हँडग्लोज घालून घरफोड्या केल्याने कोणत्याही ठिकाणी ठसे मिळून आले नाही. नंतर श्‍वानपथकास पाचारण करण्यात आले. मिस्का नावाच्या श्‍वानाने पठारे, नांदुर्डीकर, पवार यांच्या बंगल्यापासून शिरीष लोखंडेंच्या घरापर्यंत माग काढला. लोखंडे यांच्या घरातून मागील दरवाजाने अब्दुल हमीद चौकातून वीटभट्टी मार्गे देवळाली प्रवरा ते श्रीरामपूर रस्त्याने ओढ्यापर्यंत माग काढला. मगबुल पटेल यांच्या दारात चोरट्याची चप्पल राहिली होती. श्‍वानास त्या चपलेचा वास दिला असता श्‍वानाने श्रीरामपूर रस्त्याने चव्हाण वस्तीपर्यंत माग काढला. या वस्तीवरील एका महिलेने पहाटे 4 वाजता येथे एक टेंपो उभा होता, असे पोलिसांना सांगितले.

वाळूच्या वाहनांवर लक्ष
पोलिसांनी पहाटे 4 वाजता नगर-मनमाड व श्रीरामपूर रस्त्यावर नाकाबंदी केली असती तर चोरटे पोलिसांना अलगद सापडले असते. परंतु गस्तीवरील पोलिसांना घरफोडीची घटना सकाळी 7 वाजता समजली. यावरुन गस्तीसाठी नियुक्त पोलिस खरेच गस्तीवर होते का?, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. देवळाली प्रवरा पोलिस चौकीत सात पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे. परंतू एकही पोलिस चौकीवर थांबत नाही. घरफोडीच्या ठिकाणी एका वाळू एजंटने तर या पोलिस चौकीतील एक पोलिस गस्तीवर असल्यावर गस्त घालण्याऐवजी नदीचा पट्टा व वाळू वाहतूक करणार्‍या वाहनांवर लक्ष ठेवून असतो. वाळूची गाडी पकडून रात्रीच तोडपाणी करुन सोडून दिली जाते, अशी धक्कादायक माहिती दिली. देवळाली प्रवरा पोलिस चौकी असून अडचण, नसून खोळंबा अशी अवस्था झाली आहे. देवळाली प्रवराची लोकसंख्या 50 हजारापर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे येथे स्वतंत्र पोलिस स्टेशन होणे गरजेचे असल्याचे नगराध्यक्ष सत्यजीत कदम यांनी सांगितले.

COMMENTS