आभाळ फाटले ; मुंबईत 25 जणांचा मृत्यू

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आभाळ फाटले ; मुंबईत 25 जणांचा मृत्यू

चेंबूरमध्ये दरड कोसळून 17 तर विक्रोळीमध्ये इमारत कोेसळून 7 जणांचा मृत्यूमुंबई/प्रतिनिधी : चेंबुर आणि विक्रोळीसाठी शनिवारची रात्र काळरात्र ठरली. चेंबू

विविध सामाजिक उपक्रमांनी संतोष भंडारी यांचा वाढदिवस साजरा
राहुरीतील 45 पोलिस पाटील पदाची होणार भरती
‘पीएफआय’ कडून शाळेचा देशविरोधी कृत्यांसाठी वापर

चेंबूरमध्ये दरड कोसळून 17 तर विक्रोळीमध्ये इमारत कोेसळून 7 जणांचा मृत्यू
मुंबई/प्रतिनिधी : चेंबुर आणि विक्रोळीसाठी शनिवारची रात्र काळरात्र ठरली. चेंबूरमध्ये मध्यरात्री मुसळधार पाऊस कोसळल्यामुळे डोंगराच्या पायथ्याशी बांधलेली भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला असून, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यासोबतच विक्रोळीमध्ये घडलेल्या दुसर्‍या घटनेमध्ये एक दुमजली इमारत कोसळून 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर भांडूपमध्ये देखील संरक्षक भिंत कोसळून एका 16 वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला आहे.
शनिवारी रात्रभरापासून कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईची तुंबई झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. यामुळे मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचले आहे. तर काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबईत रात्रभर कोसळणार्‍या पावसामुळे तीन दुर्घटना समोर आल्या आहेत. यात आतापर्यंत 25 पेक्षा अधिक जणांना प्राण गमवावे लागले आहेत. मुंबईत कोसळणार्‍या पावसामुळे हिंदमाता, सायन, किंग्ज सर्कल, धारावी, अंधेरी, कांदिवली, मिरारोड यांसह अनेक सखल भागात पाणी साचले आहे. तसेच मुंबईतील पावसामुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील लोकल वाहतूक ठप्प झाली आहे. मध्य रेल्वे, पश्‍चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वेच्या रुळांवर पाणी साचले आहे. त्यामुळे रेल्वे वाहतूक ही बंद झाली आहे. मुंबईतील चेंबुर, विक्रोळी आणि भांडूप या भागात पावसामुळे शनिवारी मध्यरात्री तीन दुर्घटना घडल्या आहेत.
चेंबूरच्या आरसीएफ परिसरातल्या भारत नगरमध्ये ही दुर्घटना घडली. मध्यरात्री 12.30 ते 1 च्या सुमारास हा प्रकार घडल्यानंतर स्थानिकांनी तातडीने वैयक्तिक पातळीवर बचावकार्य सुरू केले. त्याच वेळी बचाव यंत्रणेला देखील माहिती देण्यात आली. त्यामुळे माहिती मिळताच एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली. या भागात सकाळी पावसाचे प्रमाण जरी कमी झाले असले, तरी पावसामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर चिखल झाला. त्यामुळे बचावकार्य करण्यात एनडीआरएफच्या जवानांना देखील मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. घरांच्या मागच्या बाजूला असलेल्या डोंगरामुळे नेहमीच या भागातील अशा दुर्घटनेची शंका उपस्थित केली जात होती.

अतिवृष्टीने मुंबई हाहाकार अग्निशम दलाची सतर्कता
मुंबईत शनिवारी मध्यरात्री अचानक सुरू झालेल्या पावसामुळे अनेक भागात हाहाकार माजला होता. वसईच्या मिठागर मध्ये 400 लोकांची वस्ती आहे. या वस्तीला पूर्ण पाण्याने वेडा टाकला होता. मध्यरात्री वसई विरार अग्निशमन दलाच्या जवानांनी 3 च्या सुमारास घटनास्थळी पोहोचून 80 नागरिकांना रेस्क्यू करून बाहेर काढले आहे. वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलातील जवानांनी दोरच्या साहाय्याने 20 लहान मुले, 25 बायका, 3 गरोदर बायका, 30 पुरुष आणि 7 ते 8 शेळ्या बकरी ह्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

राज्याकडून पाच तर केंद्राकडून दोन लाखाची मदत
मुंबईत झालेल्या दुर्घटनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुःख व्यक्त केले आहे. मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून पाच लाख तर केंद्र सरकारकडून दोन लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. मृतांच्या कुटुंबियांना शासनातर्फे पाच लाख रुपयांची मदत व जखमींवर मोफत उपचार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे, अशी माहितीही उपमुख्यमंत्र्यांनी दिली.

मिठी नदीने ओलांडली धोक्याची पातळी
मुंबईमध्ये मिठी नदी धोक्याच्या पातळीवर गेली आहे. नदीची धोक्याची पातळी 3.3 मीटरवर गेली आहे. नदी ओव्हरप्लो झाली असून पाण्याची पातळी 4.2 मीटर झाली आहे. यामुळे पालिकेने आजूबाजूच्या वस्त्या खाली करण्यास सुरुवात केली आहे. कुर्ला येथील क्रांती नगर वस्ती खाली केले जात आहे. सर्व कुटुंबाना पालिकेच्या शाळांमध्ये नेले जात आहे.

COMMENTS