Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुणे शहरावर पाणीकपात अटळ

पुणे: उन्हाच्या वाढत्या झळा आणि शहराला पाणीपुरवठा करणार्‍या खडकवासला साखळी प्रकल्पातील घटता पाणीसाठा या पार्श्‍वभूमीवर शहरात पाणीकपात अटळ आहे. म

‘तारक मेहता’ तील अभिनेत्रीने निर्मात्यांवर लावला लैंगिक छळाचा आरोप
दिव्यांगांच्या रखडलेल्या मानधनासाठी उपोषण : नय्युमभाई सुभेदार
ओडिशाच्या चांदीपूर येथे पिनाकची यशस्वी चाचणी

पुणे: उन्हाच्या वाढत्या झळा आणि शहराला पाणीपुरवठा करणार्‍या खडकवासला साखळी प्रकल्पातील घटता पाणीसाठा या पार्श्‍वभूमीवर शहरात पाणीकपात अटळ आहे. मात्र दिवसाआड पाणीपुरवठा करण्याऐवजी आठवड्यातून एकदा पाणीबंद ठेवण्याची हालचाल महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून सुरू झाली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या कालवा समितीच्या बैठकीतच या निर्णयावर शिक्कामोर्तब होणार आहे.
सध्या खडकवासला धरण साखळीत सुमारे 12.30 अब्ज घनफूट (टीएमसी) एवढा पाणीसाठा आहे. या पाण्यातून शहराची तहान भागविली जाणार असून शेतीसाठी उन्हाळी आवर्तनही देण्यासाठी पाच अब्ज घनफूट एवढे पाणी लागणार आहे. यंदा एल निनो मुळे पावसाचे प्रमाण कमी राहील, असा अंदाज वर्तविण्यात आला असून वाढत्या उन्हामुळे पाण्याची मागणीही वाढली आहे. उन्हाळ्याचा अद्यापही दीड महिन्यांचा कालावधी बाकी आहे. उन्हामुळे धरणातील पाण्याचे होणारे बाष्पीभवन लक्षात घेता पाणीकपात अटळ असल्याचे चित्र आहे. या पार्श्‍वभूमीवर महापालिका आणि जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांमध्ये तीन दिवसांपूर्वी बैठक झाली होती. खडकवासला धरणातील पाण्याचा आढावा घेताना पाणी काटकसरीने वापरण्याची सूचना जलसंपदा विभागाने महापालिकेला केली होती. या बैठकीत पाणीकपातीचा निर्णय झाला नव्हता. धरणात अपेक्षित पाणीसाठा नसल्याने समाधानकारक पावसाळा सुरू होईपर्यंत दिवसाआड पाणीपुरवठा केला जाईल, अशी चर्चा आहे. मात्र दिवसाआड पाणीबंद ठेवण्याऐवजी आठवड्यातून एकदा पाणीबंद करण्याचे महापालिकेच्या विचाराधीन आहे. शहराच्या अनेक भागाला सध्या विस्कळीत आणि अपुरा पाणीपुरवठा होत आहे. दिवसाआड पाणीपुरवठा केल्यास त्याचा परिणाम पुढील दोन दिवस रहातो. पाणीबंद असल्यानंतर पुढील काही दिवस अपुरा पाणीपुरवठा होता. त्यामुळे आठवड्यातून एकदा पाणीबंद ठेवणे उपयुक्त राहील, असा दावा महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आला आहे. मात्र त्याबाबतचा अंतिम निर्णय पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली येत्या काही दिवसांत होणार्‍या कालवा समितीच्या बैठकीत होणार आहे. पाण्याची गळती शोधण्यासाठी महापालिकेने प्रायोगिक तत्वावर ‘केस्टीक सेन्सर’ या अधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सुरूवात केली आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने वडगाव जलकेंद्रापासून कात्रज येथील केदारेश्‍वर पाण्याच्या टाकीपर्यंतच्या मुख्य वाहिनीवर 13 ठिकाणी गळती होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानुसार गळती बंद करण्याचे काम हाती घेतले आहे. याच पद्धतीने मुख्य जलवाहिन्यांमधून होणारी पाण्याची गळती शोधून ती बंद केली जाणार आहे. तसेच पिण्याच्या पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर गाड्या धुण्यासाठी करणार्‍या वॉशिंग सेंटरवरही कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच बांधकामासाठी सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करण्याची सूचना बांधकाम व्यावसायिक आणि महापालिकेच्या अन्य विभागांना देण्यात आले आहेत.

COMMENTS