राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडून, नव्या युवकांना संधी देण्याचे भाष्य केलं आहे. राजकारणामध्ये कोणत्याही

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडून, नव्या युवकांना संधी देण्याचे भाष्य केलं आहे. राजकारणामध्ये कोणत्याही घडामोडी सहजासहजी होत नाही. त्यामुळे, जयंत पाटील यांच्या या भूमिकेमागे मोठे कारण आहे. आता पावेतो जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस मधून सत्ताधारी राहिले असले, तरीही, सत्ताधारी भारतीय जनता पक्ष त्यांच्या मागे फार लागलेला नाही. याचे कारण जयंत पाटील यांचा राजकीय सत्तेचा प्रवास पूर्णपणे निष्कलंक आहे, असा नव्हे! तर, त्यांची मुख्य भूमिका सावरण्याची बाब जी आहे, ती त्यांच्या शिवप्रतिष्ठानाच्या उभारणीमागे असलेला त्यांचा हात, किंबहुना संभाजी भिडे यांच्याशी त्यांचे असलेले ऋणानुबंध; याच माध्यमातून जयंत पाटील हे आज पावेतो राजकीय दृष्ट्या सुरक्षित आहेत. आता त्यांच्या भाषेत असलेल्या मोठ्या साहेबांनीच म्हणजे शरद पवारांनी पक्ष एकत्रिकरणाची सूचक वक्तव्य करण्याचे प्रमाण हळूहळू वाढवले असल्यामुळे, पक्षावर पकड घेण्यासाठी सुप्रिया सुळे यांना संधी मिळावी, हीच या मोठ्या साहेबांची भूमिका आहे. शरद पवारांच्या सूचने शिवाय जयंत पाटील यांनी ही भूमिका घेतली आहे, असे म्हणता येणार नाही. महाराष्ट्रात राजकीयदृष्ट्या कोणतीही घटना घडली तरी, त्यामागे शरद पवार यांचा हात असतो, असं सातत्याने बोललं जातं. परंतु, जेव्हा त्यांच्याच पक्षात एवढी मोठी घडामोड होते; तेव्हा, शरद पवार यांचा सहभाग नसेल, असे म्हणता येत नाही. जयंत पाटील हे सभागृहामध्ये विचार मांडत असले, तरीही, आज पावेतो ते सभागृहात आक्रमक पद्धतीने मांडणी करू शकलेले नाहीत. हसत खेळत मांडत राहणं आणि सर्व पक्षांशी समान भूमिका ठेवणं व सतत संपर्कात राहणे, हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. पण, त्याचवेळी डोक्यामध्ये जातीय मानसिकता ठेवणं ही बाब त्यांच्या बाबतीत अनेक वेळा दिसून आली आहे. नरहरी झिरवळ जे सध्याच्या काळामध्ये महायुतीमध्ये मंत्री आहेत; ते एकेकाळी विधानसभेचे उपाध्यक्ष असताना, त्यांनी महाविकास आघाडीच्या काळात अध्यक्षपदाचा हंगामी कालावधी पार पाडला होता. परंतु, त्याविषयी बोलताना जयंत पाटील एकदा म्हणाले होते की, झिरवळ आदिवासी असले तरी त्यांनी बऱ्यापैकी सभागृह चालवलं; या त्यांच्या वाक्यामध्ये जातीय मानसिकता दडलेली होती. जयंत पाटील हे राज्यात सर्वाधिक कर्मठ असे नेते खरेतर आहेत. परंतु, त्यांच्या गोड बोलण्याने आजपावेतो ते महाराष्ट्राला कर्मठ वाटलेले नाहीत! वस्तुस्थिती अशी आहे की, सामाजिकदृष्ट्या जयंत पाटील हे अतिशय कडवे आहेत. त्यांच्या डोक्यामध्ये नेहमीच सत्ताधारी वर्गाचा एक अहंकार दडलेला असतो. ते सभागृहात गोड बोलत असले तरी, प्रत्यक्षात त्यांच्या आचरणातून जातीय मानसिकता वेळोवेळी जाणवते. त्यामुळे जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्षपद जर सोडत असतील तर, ती त्यांची इच्छा नसून, ती सुप्रीमोंची इच्छा आहे, आणि त्याचं फक्त त्यांना पालन करायचं आहे. याचा अर्थ जयंत पाटील हे भाजपात जातील असा नव्हे; तर, नव्या जडणघडणीमध्ये त्यांच्या वाटेला मुख्य भूमिका येण्याशिवाय ते फारसं हिरीरिने सहभाग पक्षाच्या कार्यक्रमात किंवा कार्यामध्ये घेऊ शकणार नाहीत, असं मात्र एकंदरीत दिसतं. शरद पवार यांच्या डोक्यात राष्ट्रवादी काँग्रेस विषयी दोनच पर्याय आहेत; एकतर, दोन्ही गटांचं एकत्रिकरण आणि दुसरं म्हणजे काॅंग्रेसमध्ये सामिल होणे. मात्र, दोन्हीही अवस्थेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा विलय आहे, हे निश्चित. सुप्रिया सुळे यांना सुप्रिमो बनविणे हे त्यांचे उद्दिष्ट असले तरी, मुख्य पक्ष अजित पवार यांच्या ताब्यात; तर, काॅंग्रेस मध्ये आधीच नेतृत्वाच्या साठमारीत भवितव्य नसावं, असाही त्यांचा होरा असावा. परंतु, एकत्रित या सर्व बाबी जयंत पाटील यांच्या अध्यक्षपद सोडण्याच्या निमित्ताने चर्चेला आल्या आहेत.
COMMENTS