कोपरगाव : मतदारसंघातील ग्रामीण भागातील रस्त्यांवरून क्षमतेपेक्षा अधिक भार वाहून नेणाऱ्या अवजड वाहनांमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत अ

कोपरगाव : मतदारसंघातील ग्रामीण भागातील रस्त्यांवरून क्षमतेपेक्षा अधिक भार वाहून नेणाऱ्या अवजड वाहनांमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने आता कडक कारवाईचे संकेत दिले आहेत. आमदार आशुतोष काळे यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंत जोशी यांच्यासमवेत बैठक घेत ओव्हरलोड वाहतुकीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती, त्याची दखल आता प्रशासनाने घेतली आहे.
ग्रामीण भागातील अंतर्गत दळणवळण सुलभ व्हावे यासाठी पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून रस्ते उभारण्यात आले आहेत. मात्र, या रस्त्यांवर निर्धारित क्षमतेपेक्षा अधिक वजनाची वाहने मोठ्या प्रमाणावर धावत असल्याने रस्ते खचून खराब होत आहेत. अशा वाहतुकीमुळे रस्त्यालगत राहणाऱ्या नागरिकांसह पादचाऱ्यांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
बैठकीत आमदार काळे यांनी “ग्रामीण मार्गांवरून दिवस-रात्र सुरू असलेल्या ओव्हरलोड वाहतुकीकडे परिवहन विभाग दुर्लक्ष का करीत आहे,” असा थेट सवाल उपस्थित केला. तसेच यापुढे तातडीने कारवाई झाली नाही तर अधिक आक्रमक भूमिका घ्यावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
आमदार काळे यांच्या सूचनांची गांभीर्याने दखल घेत परिवहन विभागाने बैठकीनंतर काही तासांतच ग्रामीण मार्गांवरील ओव्हरलोड वाहनांवर कडक कारवाई करण्याचे आदेश जारी केले. त्यामुळे अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या अनधिकृत वाहतुकीला आळा बसण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागातील नागरिकांनी आमदार आशुतोष काळे यांनी घेतलेल्या या आक्रमक भूमिकेचे स्वागत केले आहे.

COMMENTS