..तर, ‘लोकमंथन’ समाजासमोर ‘त्यांना’ नागवे केल्याशिवाय राहणार नाही!

Homeताज्या बातम्यासंपादकीय

..तर, ‘लोकमंथन’ समाजासमोर ‘त्यांना’ नागवे केल्याशिवाय राहणार नाही!

  दैनिक लोकमंथन हे भारतातील बहुजन समाजाचे साखळी पद्धतीने चालविले जाणारे एकमेव दैनिक आहे. आरंभापासूनच दैनिक लोकमंथन ने फुले, शाहू, आंबेडकरी ही विचारधा

अंगावर झाड कोसळून रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू
राज्यातील रुग्णालयांचे ऑक्सिजन, इलेक्ट्रिक, फायर ऑडीट तातडीने करा : अजित पवार
थलापती विजयने आई-वडिलांविरोधात दाखल केली तक्रार, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय? (Video)

  दैनिक लोकमंथन हे भारतातील बहुजन समाजाचे साखळी पद्धतीने चालविले जाणारे एकमेव दैनिक आहे. आरंभापासूनच दैनिक लोकमंथन ने फुले, शाहू, आंबेडकरी ही विचारधारा, आपली मूलभूत विचारधारा म्हणून स्वीकार केलेली आहे. फुले, शाहू, आंबेडकर विचारधारा ही दिवसेंदिवस शक्तीशाली होत असून आज ती भारताची प्रमुख विचारधारा झालेली आहे. राजकीय सत्ता लोकशाही व्यवस्थेत येत-जात राहतात. मात्र, त्यातून सामाजिक विचारधारा बदलत नसते. फुले-शाहू-आंबेडकरी विचारांशी सुसंगत सामाजिक प्रतिकेच भारतीय समाजात स्विकारली जातात अथवा लोकप्रिय होतात ही वस्तुस्थिती आहे. आज कोणत्याही सामाजिक, राजकीय, प्रशासकीय, न्यायालयीन व्यवस्थेत याच विचारधारेचे प्राबल्य आहे.  ही विचारधारा हीच सर्वंकष समाजाच्या समतेची, न्यायाची, स्वातंत्र्याची आणि बंधूतेची ग्वाही देणारी आहे! भारतीय संविधानिक लोकशाही याच विचारधारेवर साकारली गेली आहे. वास्तविक पाहता भारतीय संविधान निर्मिती करणाऱ्या संविधान सभेमध्ये एकूण २९९ सदस्य निवडले गेले, नंतर ती संख्या फाळणीमुळे काही प्रमाणात कमी झाली. मात्र,  या सदस्यांमध्ये पंधरा महिला आणि अनुसूचित जाती-जमाती यांचे प्रतिनिधित्व सोडले तर उच्चजातीय आणि खास करून ब्राह्मण जातीतून संविधान सभेमध्ये सर्वाधिक प्रतिनिधी होते. त्यामुळे हे संविधान देशाच्या सर्वजण समाजाचे प्रतिनिधित्व करणारे आहे; आणि ते सर्वांना समतेचा आणि लोकशाहीचा समान अधिकार देणारे आहे. संविधानाची हीच भूमिका दैनिक लोकमंथन ने अग्रणी मानली आहे. जात, धर्म, वर्ग, लिंग, प्रांत अशा कोणत्याही भेदाला दैनिक लोकमंथन ने कधीही थारा दिला नाही. संसदीय लोकशाही ज्या संविधानावर आधारलेली आहे त्या संविधानाचे तत्व हेच दैनिक लोकमंथन ने आपल्या मूलभूत विचारांशी बांधून ठेवले आहे. फुले, शाहू, आंबेडकरी विचारधारा कोणत्याही जाती धर्माच्या विरोधात नाही आणि कोणत्याही जाती-धर्माचे श्रेष्ठत्व मानून घेणारी नाही. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि मराठा अशा कोणत्याही जाती प्रवर्ग समाजाविरोधात आम्ही कधीही लेखन केलेले नाही. प्रसंगी या वरच्या जातप्रवर्गात सर्वांनी जरी एकमेकांच्या द्वेषाचे समाजकारण किंवा राजकारण केले असले तरी त्यावर आम्ही कडाडून प्रहार देखील केला आहे. पुण्याचे खोले बाईने, ‘मराठा समाजाच्या शूद्र स्त्रीने आपल्या घरात स्वयंपाक केल्यामुळे आम्हाला बाटवल्याचा आरोप केला, त्यावेळी आम्ही त्या ब्राह्मणवादी भूमिकेवर कडाडून प्रहार केला. जो मराठा समाज राजकीय सत्तेवर गेली अनेक दशके राहिलेला आहे, आणि मराठा आरक्षणासाठी ज्या समाजाचे क्रांती मोर्चाची ताकद महाराष्ट्राने प्रचंड मोठ्या प्रमाणात पहिले तो समाज या प्रकरणावर काही बोलला नाही. परंतु सामाजिक न्यायाची भूमिका म्हणून आणि संविधानिक मूल्य म्हणून आम्ही या भूमिकेवर कडाडून टीका केली होती. मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल तर त्याला आम्ही कधी विरोध केला नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, मात्र ते ओबीसींच्या हक्काच्या आरक्षणातून न देता  स्वतंत्रपणे मिळाले पाहिजे, ही भूमिका आम्ही वारंवार मांडलेली आहे. या संदर्भात आम्ही मराठा समाजातील बुद्धिजीवी नेतृत्व करणारे पुरुषोत्तम खेडेकर यांच्याशी कायम मैत्रीसंबंध आणि मराठा समाजाच्या सर्व संघटनांशी आमचे मैत्री संबंध राहिले आहे. दलित आदिवासी आणि ओबीसींच्या हक्कांसाठी तर आम्ही कायमच न्याय्यपूर्ण लढा या महाराष्ट्रामध्ये दैनिक लोकमंथन च्या माध्यमातून लढलेला आहे. दैनिक लोकमंथनने कोणत्याही आर्थिक स्वार्थावर आपली पत्रकारिता केलेले नाही. प्रश्न कोणताही असो त्याच्यावर आपली परखड भूमिका कायम मांडलेली आहे. मात्र अशा या लोकशाहीवादी सर्वजण समाजाला न्याय्य भूमिका देणारे आणि कोणताही अन्याय अत्याचार खपवून न घेणारे दैनिक लोकमंथन च्या संदर्भामध्ये कोणत्याही पातळीवर राजकीय, प्रशासकीय, सामाजिक अशा स्तरावर कोणी षड्यंत्र करण्याचा प्रयत्न केला तर त्याला जागीच ठेचल्याशिवाय लोकमंथन मागे हटणार नाही. आम्हाला माहीत झाले आहे की, महाराष्ट्रातील तथाकथित काही शक्ती ज्या भडभुंजा व्यक्तिमत्त्वाच्या असतील त्यांनी दैनिक लोकमंथन संदर्भात षडयंत्र करताना आपल्या नाड्या आधी सुटणार नाहीत, अशारितीने बांधाव्या! अन्यथा, दैनिक लोकमंथनच्या रोखठोक भूमिकेविरोधात टिकणे भल्याभल्यांना अवघड गत झाल्याचे महाराष्ट्रातील जनतेने पाहिले आहे! दैनिक लोकमंथन विरोधात षडयंत्रकारी भूमिका घेण्याचा कुणी प्रयत्न केला तर, त्या शक्ती कोण आणि किती उंचीच्या आहेत, याचा विचार न करता दैनिक लोकमंथन त्यांना समाजासमोर नागवे केल्याशिवाय राहणार नाही!

COMMENTS