नवी दिल्ली ः दहशतवादाविरोधात संपूर्ण देश एक झाला असून, आज प्रत्येक भारतीयांचा एकच निर्धार आहे की, आपल्याला दहशतवाद संपवायचा आहे, ऑपरेशन सिंदूर ‘ऑ

नवी दिल्ली ः दहशतवादाविरोधात संपूर्ण देश एक झाला असून, आज प्रत्येक भारतीयांचा एकच निर्धार आहे की, आपल्याला दहशतवाद संपवायचा आहे, ऑपरेशन सिंदूर ‘ऑपरेशन सिंदूर’ ही केवळ एक लष्करी मोहिम नाही, ती आपला निर्धार, धैर्य आणि बदलत्या भारताचे प्रतिबिंब असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले. मन की बात मधून पंतप्रधान मोदी देशाला संबोधित करत होते.
यावेळी बोलतांना पंतप्रधान मोदी म्हणाले की, संपूर्ण देशाला देशभक्तीच्या भावनेने भारून टाकले आहे, तिरंग्याने रंगवले आहे. देशातील अनेक शहरांत, गावांत, लहान लहान वस्त्यांमधून तिरंगा यात्रांचे आयोजन झालेले आपण पाहिलं आहे. हजारो लोक हातात तिरंगा घेऊन देशाच्या सेनेला वंदन आणि अभिनंदन करण्यासाठी बाहेर पडले. अनेक शहरांत नागरी संरक्षण दलामध्ये स्वयंसेवक होण्यासाठी मोठ्या संख्येने युवक एकत्र आले, चंदीगडचे व्हिडीओज तर खूप व्हायरल झालेलं आम्ही पाहिलं. सोशल मीडियावर कविता लिहिण्यात येत होत्या, निर्धार गीतं गायली जात होती. लहान मुलं मोठे संदेश देणारी चित्र काढत होती. मी तीन दिवसांपूर्वी बीकानेरला गेलो होतो, तिथे मुलांनी मला असेच एक चित्र भेट दिले. ‘ऑपरेशन सिंदूर’ ने देशातील लोकांवर इतका प्रभाव टाकला आहे की, अनेक कुटुंबांनी त्याला आपल्या आयुष्याचा भाग बनवलं. बिहारच्या कटिहारमध्ये, उत्तर प्रदेशच्या कुशीनगरमध्ये, आणखीनही अनेक शहरांत त्या काळात जन्मलेल्या मुलांचे नामकरण ‘सिंदूर’ असे करण्यात आले. आपल्या जवानांनी दहशतवाद्यांच्या तळांना उद्ध्वस्त केले, हे त्यांचे दुर्दम्य साहस होतेच आणि त्यात भारतात बनवलेली शस्त्र, उपकरण आणि तंत्रज्ञानाची ताकद होती. यात ‘आत्मनिर्भर भारत’चा निर्धारही होता. आपल्या अभियंत्यांच्या, तंत्रज्ञांच्या, प्रत्येकाच्या घामामुळेच हा विजय मिळाला आहे. या मोहिमेनंतर संपूर्ण देशात ‘वोकल फॉर लोकल’या संकल्पनेला नवीन ऊर्जा मिळाली आहे. अनेक गोष्टी मनाला भिडत आहेत, एका आई-वडिलांनी सांगितले-आता आम्ही आपल्या मुलांसाठी फक्त भारतात बनवलेली खेळणीच घेणार आहोत. देशभक्तीची सुरुवात अशी बालपणापासून होईल. काही कुटुंबांनी शपथ घेतली आहे-आम्ही आमच्या पुढील सुट्ट्या देशातीलच एखाद्या सुंदर ठिकाणी घालवू. अनेक युवकांनी ‘वेड इन इंडिया’चा निर्धार केला आहे, ते देशातच लग्न करणार आहेत. काहींनी असंही म्हटलं आहे की, आता आम्ही केवळ, भारतीय कारागिरांनी तयार केलेलीच भेटवस्तू देऊ. मित्रांनो, हीच तर भारताची खरी ताकद आहे-‘जनमानसाची जोडणी, जनभागीदारी’ मी तुम्हा सर्वांना आग्रहाची विनंती करतो की, या टप्प्यावर आपण एक निर्धार करूया-’आपण आपल्या आयुष्यात जिथे शक्य असेल तिथे देशात बनवलेल्या वस्तूंना प्राधान्य देऊया. ही फक्त आर्थिक आत्मनिर्भरतेची गोष्ट नाही, ही राष्ट्रनिर्मितीत भागीदार बनण्याची भावना आहे. आपले एक पाऊल भारताच्या प्रगतीत मोठे योगदान ठरू शकते, असेही यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले.
योगापासून दूर असला तर आता जोडून घ्या
आंतरराष्ट्रीय योग दिनाला आता एक महिन्यापेक्षाही कमी काळ शिल्लक आहे. आपण अजूनही योगा पासून दूर असाल तर आता योगाशी जोडून घ्या हे समजावून सांगणारी ही संधी आहे. तुमच्या जगण्याची पद्धत योगामुळे बदलून जाईल. मित्रहो, 21 जून 2015 ला योगदिनाची सुरुवात झाल्यापासूनच याबद्दलचं आकर्षण सातत्याने वाढत आहे. यावर्षीही योगदिनाबाबत जगभरातल्या लोकांचा जोश आणि उत्साह दिसून येत आहे. वेगवेगळ्या संस्था आपापल्या तयारीबद्दल माहिती देत आहेत. गेल्या वर्षीच्या छायाचित्रांनी मोठी प्रेरणा दिली असल्याचे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.
COMMENTS