Homeताज्या बातम्यासंपादकीय

बिहारमध्ये ओबीसी ‘सब पे भारी!’

बिहारच्या जातनिहाय जनगणनेचे आकडे २ ऑक्टोबर ला गांधी जयंतीनिमित्त  अखेर जाहीर करण्यात आली. या जनगणनेच्या अनुषंगाने बिहारमधील ओबीसी म्हणजे इतर मागा

आंदोलन, हल्ला आणि हिरोगिरी! 
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची परखडता ! 
माध्यम नायक बबनराव कांबळे !

बिहारच्या जातनिहाय जनगणनेचे आकडे २ ऑक्टोबर ला गांधी जयंतीनिमित्त  अखेर जाहीर करण्यात आली. या जनगणनेच्या अनुषंगाने बिहारमधील ओबीसी म्हणजे इतर मागासवर्गीयांची संख्या ही सर्वाधिक असून त्यांची टक्केवारी एकूण ६३.३% एवढी आहे. मात्र, ओबीसींची विभागणी या जातनिहाय जनगणनेमध्ये दोन भागात करण्यात आली आहे; पहिला भाग हा, पिछडा आणि दुसरा अतिपिछडा. पिछडा या प्रवर्गांमध्ये एकूण २७.१% एवढी ओबीसींची संख्या आहे; तर, अतिपिछडा या प्रवर्गामध्ये ३६.२% एवढी ओबीसींची संख्या आहे. अनुसूचित जातीची देखील लोकसंख्या बिहारमध्ये भारी भरकम म्हणजे १९.६५% एवढी आहे. अर्थात, भारताची सामाजिक आकडेवारी नेहमी १५:८५ या अनुषंगाने सांगितली जाते. बहुजन समाज ८५ टक्के आहे; तर, वरच्या जाती या १५ टक्के आहेत. हे समीकरण भारतात कायम वापरले जाते. तीच परिस्थिती प्रत्यक्षात बिहारमध्ये दिसून आली. यात सर्वात मोठी बाब म्हणजे ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेमध्ये सर्वाधिक लोकसंख्या ही यादव जातीची असून ती १४.२३% एवढी आहे ओबीसी प्रवर्गातील सर्वाधिक मोठी जात असणारी यादव यांची संख्या एवढी मोठी आहे की, त्यांच्या जवळपास देखील कोणत्याही जातीचा समुदाय दिसत नाही. प्रत्येक जातीची लोकसंख्या ही चार टक्के आणि त्यापेक्षा कमीच आहे. प्रवर्ग म्हणून अनुसूचित जातींची लोकसंख्या १९.६५% असली तरी त्यामध्ये जातींची विभागणी वेगवेगळी आहे, हे वास्तव जर आपण पाहिलं तर बिहारच्या लोकसंख्येमध्ये ओबीसींची दिसणारी लोकसंख्या ही सर्वाधिक आहे.  त्यामुळेच गेली ३५ वर्ष बिहारमध्ये सातत्याने दोनच ओबीसी नेत्यांची सत्ता राहिली आहे; एक अर्थातच लालूप्रसाद यादव आणि दुसरे नितीश कुमार. त्यापूर्वीही कर्पुरी ठाकूर यांच्या माध्यमातून ओबीसी समाजाच्या हाती राज्याचे नेतृत्व राहीले. जातनिहाय जनगणनेच्या माध्यमातून प्रत्येक जातींची संख्या स्पष्टपणे दिसून आली. तरीही, अवघ्या २.८७% म्हणजे तीन टक्के पेक्षाही कमी लोकसंख्या असणाऱ्या कुर्मी या जातीतून मुख्यमंत्री नितीश कुमार हे आहेत. याचा अर्थ जातीची संख्या परिवर्तन करित नसून, व्यक्तीने स्वीकारलेले विचार आणि त्या आधारे जन समूहाचं केलेलं प्रबोधन, हेच परिवर्तनाच्या राजकारणाकडे नेणारे असते.  ही गोष्ट गेली पस्तीस वर्षे बिहार अनुभवतो आहे. अर्थात, लालूप्रसाद यादव आणि नितीश कुमार यांच्या राजवटीवर सध्या प्रस्थापित वरच्या जातींनी टीका केली असली आणि लालूप्रसाद यादव यांच्या राज्याला जंगलराज म्हटले गेले असले तरी, ती एक प्रकारची वरच्या जातींची  मानसिकता आहे!  ज्या पद्धतीने लोकशाही व्यवस्थेमध्ये दीर्घकाळ लालूप्रसाद यांनी नितीशकुमार यांची सत्ता चालवली आहे, ते पाहता बिहारच्या लोकसंख्येमध्ये ते अत्यंत लोकप्रिय नेतृत्व आहे. निवडणुकीच्या काळामध्ये अनेक जातींनी लालूप्रसाद यादव यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली होती. खास करून मुषशर जातींच्या लोकांनी तर, लालूप्रसाद यादव यांनी आमचे जीवनमान बदलवलं होतं, अशा प्रकारे प्रतिक्रिया दिल्या होत्या. कारण, त्यांनी कोणतेही स्थैर्य नसलेल्या या समूहाला शहराच्या मध्यवर्ती भागात वसाहती निर्माण करून दिल्या होत्या. त्यांच्या दृष्टीने ही सर्वात मोठी बाब होती. बिहारच्या सत्ताधाऱ्यांनी काम केलं असलं, तरीही विचारांच्या दिशेने जर आपण बघायला गेलं तर, या लोकसंख्येची सामाजिक पातळीवरची विभागणी  निश्चितपणे  एक वैचारिक बांधिलकी मानते. लालूप्रसाद यादव यांनी संघ परिवार किंवा भारतीय जनता पक्ष यांच्या सोबत कायम द्वंद्व घेतले आहे. याचे कारण त्यांच्या वैचारिक बांधिलकीत आहे!

COMMENTS