Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सिन्नर बाजार समितीत आमदार कोकाटेंना झटका 

नाशिक प्रतिनिधी - सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार माणिकराव कोकाटे यांना धक्का बसला. सभापतिपदी वाजे गटाचे शशिकांत गाडे विराजमान झाले आ

महावितरण विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक
सातारा-स्वारगेट मार्गावर ई-शिवाई बस सोडण्याची मागणी
एसटी कर्मचार्‍यांची परवड…

नाशिक प्रतिनिधी – सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार माणिकराव कोकाटे यांना धक्का बसला. सभापतिपदी वाजे गटाचे शशिकांत गाडे विराजमान झाले आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या वाजे यांनी लावलेल्या राजकीय फिल्डिंगमुळे अजित पवार गटाचे आमदार कोकाटे पराभूत झाले.

बाजार समितीच्या गतवर्षी झालेल्या निवडणुकीत कोकाटे आणि वाजे घटाला समसमान नऊ जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी कोकाटे गटाच्या महिला संचालक सिंधुताई कोकाटे वाजे गटाबरोबर आल्याने वाजे गटाचे सोनांबे येथील डॉ. रवींद्र पवार सभापती झाले होते. अतिक्रमण केल्याच्या मुद्द्यावरून डॉ. पवार अपात्र ठरल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या सभापतिपदासाठी निवडणूक झाली.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीत मोठी चुरस होती. मात्र, शिवसेना ठाकरे गटाच्या वाजे यांनी लावलेल्या राजकीय फिल्डिंगमुळे अजित पवार गटाचे आमदार कोकाटे अपयशी ठरले. या निवडणुकीत कोकाटे यांचे विश्वासू सहकारी आणि बाजार समितीचे संचालक नवनाथ नेहे आणि शशिकांत गाडे या दोन संचालकांनी ऐनवेळी शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला. त्यामुळे कोकाटे गट अल्पमतात गेला.

बाजार समितीच्या अतिशय वेगाने घडलेल्या राजकीय घडामोडींमध्ये कोकाटे गट सोडलेल्या शशिकांत गाडे यांची सभापतिपदी बिनविरोध निवड झाली. अल्पमतात आल्याने कोकाटे गटाच्या सभापतिपदासाठी अर्ज भरलेले संजय खैरनार यांना माघार घ्यावी लागली.

रविवारी सकाळी ११ वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात सभापतिपदासाठी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आले. या पदासाठी माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या गटाकडून शशिकांत गाडे व कोकाटे गटाकडून संजय खैरनार यांनी अर्ज दाखल केले होते. वाजे व सांगळे गटाकडे अधिक सदस्य असल्याकारणाने खैरनार यांनी आपला दाखल केलेला अर्ज मागे घेतला. यामुळे सभापतिपदासाठी शशिकांत गाडे यांची निवड बिनविरोध झाली.

निवडीनंतर वाजे गटाच्या कार्यकर्त्यांनी समितीच्या कार्यालयाबाहेर फटाके फोडून जल्लोष केला. गाडे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी उदय सांगळे, बाळासाहेब वाघ, राजेश गडाख, भारत कोकाटे, संजय सानप, अरुण वाघ, नामदेव शिंदे, विठ्ठल राजेभोसले आदींसह दोन्ही गटाचे संचालक उपस्थित होते. राजाभाऊ वाजे यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नाला प्राधान्य देण्यात येईल, अशी ग्वाही दिली.

COMMENTS