मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाच्या निर्मात्याला फाशी द

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाच्या निर्मात्याला फाशी द्यावी अशी मागणी आव्हाड यांनी केली आहे. आव्हाडांच्या या बेताल वक्तव्यावरून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाला भाजप शासित राज्यांमध्ये टॅक्स फ्री करण्यात येत आहे. तर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी सरकारने या चित्रपटावर बंदी घातली आहे. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे. आव्हाड म्हणाले की, ‘द केरला स्टोरी’च्या नावाखाली एका राज्याची आणि तेथील महिलांची बदनामी करण्यात आली आहे. अधिकृत आकडा जो समोर आला आहे तो 3 असून त्याला 32 हजार दाखवण्यात आले. या काल्पनिक चित्रपटाची निर्मिती करणार्या व्यक्तीला सार्वजनिकरित्या फाशीची दिली पाहीजे, असे आव्हाड म्हटले आहेत.सध्याच्या घडीला ‘द केरला स्टोरी’ चित्रपटावरुन मोठ्या वादाला सुरुवात झाली आहे. लव जिहाद सारख्या वेगळ्या मुद्याला स्पर्श करत हा चित्रपट हिंदू आणि मुस्लिम या दोन धर्मांतील काही गोष्टींवर प्रकाशही टाकतो. दरम्यान 5 मे रोजी प्रदर्शित झालेल्या ‘द केरला स्टोरी’ वरुन वेगळ्या प्रकारची चर्चा सुरु झाली आहे. सोशल मीडियावर देखील या चित्रपटावरुन वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या जात आहे. प्रतिक्रिया देण्यात बॉलीवूडचे दिग्गज सेलिब्रेटी, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते यांची संख्या मोठी आहे.काही लोक या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणीही करत आहेत. यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने सुनावणी करण्यास नकार दिला. यासोबतच उच्च न्यायालयानेही चित्रपटावर बंदी घालण्यास नकार दिला.
COMMENTS