Homeताज्या बातम्यासंपादकीय

महापुरूषांनी स्वसामर्थ्यावर शाळा सुरू केल्या !

 महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा काढल्या ते समाजाच्या उत्थानासाठी. चंद्रकांत पाटील यांच्या वि

मूक समाजाच्या दिशेने ? 
अंबड ओबींसीं महासभा निमित्ताने…….
अन्यथा, माणसांची यंत्रे बनतील ! 

 महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा काढल्या ते समाजाच्या उत्थानासाठी. चंद्रकांत पाटील यांच्या विधानामागे त्यांच्या मेंदूची शास्त्रीय मशागत ज्या सांस्कृतिक अंगाने झाली, त्याचा दुष्परिणाम आता त्यांच्या वक्तव्यातून उमटू लागला आहे. खरेतर, महात्मा फुले हे जात्याच उद्योजक होते. त्यांचे सर्व लेखन हे शेतकऱ्यांच्या शोषणासंदर्भात आहे. शेतकऱ्यांचे शोषण दुहेरी आहे, असं मांडणारे महात्मा फुले हे पहिले तत्त्वज्ञ आहेत. सामाजिक आणि आर्थिक स्तरावर केले जाणाऱ्या शोषणातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी जी दीर्घकालीन मोहीम हाती घेतली, त्यातूनच त्यांनी शाळा सुरू केल्या. कोणत्याही समाजाचे शिक्षणाअभावीच सारे शोषण होते, हे तत्त्वज्ञान त्यांनी एका ओळीत सांगितले, “…….. इतके अनर्थ एका अविद्येने केले. बहुजन समाजातील शेतकरी, स्त्रिया शूद्र, अस्पृश्य, यांचे शोषण किंवा पिळवणूक ही शिक्षणाच्या अभावानेच होत असल्याचा त्यांचा अंतिम निष्कर्ष होता. यातूनच त्यांनी शाळा सुरू केल्या. पण, त्या सुरू करताना त्यांनी आपल्या आर्थिक सुबत्तेतूनच केले. 

      डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मुळातच अर्थतज्ञ. ब्रिटीशांच्या अर्थव्यवस्थेची आपल्या प्रबंधातून परखड समिक्षा आणि विश्लेषण करणारे डॉ. आंबेडकर हे स्वत:चे अर्थकारण अगदी प्रबळ करून व्यवहार करित. तत्कालीन शेअर मार्केट पासून तर सर्व आर्थिक क्षेत्रात त्यांचा वावर सहज वाटावा असा होता. पिपल्स एज्युकेशन सोसायटी च्या माध्यमातून औरंगाबादमध्ये मिलिंद महाविद्यालय आणि वस्तीगृहापासून शैक्षणिक चळवळीची सुरुवात करणारे डॉ. आंबेडकर यांनी मुंबई चा सर्वात महत्त्वपूर्ण असलेल्या फोर्ट सारख्या विभागात सिध्दार्थ महाविद्यालय सुरू केले. ज्याच्या मुळात: तीन इमारती होत्या. त्यातील पहिली बुध्द भवन, दुसरी आनंद भवन आणि तिसरी सुखडवाला. परंतु, सुखडवाला या इमारतीचे काय झाले कुणाला कळले नाही. बुध्द भवन आणि आनंद या इमारती देखील डॉ. आंबेडकर यांनी ब्रिटिशांकडून विकत घेतल्या. त्यातील एक इमारत जपानच्या मध्यवर्ती बॅंकेची होती. जी दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटीशांच्या ताब्यात होती. मिलिंद महाविद्यालय आणि सर्व महाविद्यालये ही डॉ. आंबेडकर यांनी आपल्या मेहनतीच्या पैशांनी विकत घेतल्या. डॉ. आंबेडकर यांनी भारतात अनेक ठिकाणी जमिनी घेतल्या. त्यावर बऱ्याच म्हणजे दिल्ली, चेन्नई  (मद्रास) सारख्या महानगरात आंबेडकर भवन उभे आहेत. मुंबईत देखील डॉ. आंबेडकर यांनी खरेदी केलेल्या जमिनीचे अनेक भूखंडांचा तपास लागत नाही. 

   कर्मवीर भाऊराव पाटील यांनी खासकरून ग्रामीण भागातील बहुजन समाजाच्या मुलांना शिकता यावं म्हणून शैक्षणिक संस्था उभारल्या. रयत शिक्षण संस्था माहीत नसेल असा एकही नागरिक या महाराष्ट्रात एकही व्यक्ती नसेल. कर्मवीर भाऊराव पाटील हे चंद्रकांत पाटील यांच्याप्रमाणेच जैन धर्मिय होते. परंतु, त्यांची जाणीव ही बहुजन समाजाच्या कल्याणाची होती. तर, चंद्रकांत पाटील यांची जाणीव ही उच्च जातीय धनदांडगे यांच्या हिताची आहे. सीएस‌आर फंड हा खरेतर कंपन्यांनी आपल्याच गोटात फस्त करण्याचे षडयंत्र विकसित केले आहे. कोणत्याही कंपनीचा सीएस‌आर फंड हा त्याच कंपनीने सुरू केलेल्या एनजीओकडे वर्ग केला जातो. लोकांच्या हिताचा वा कल्याणाचा कोणताही हेतू नसलेला सीएस‌आर फंड म्हणजे समाजाच्या कल्याणाच्या नावे मोठ्या भांडवलदारांनी जिरवलेला निधी असतो, असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही. चंद्रकांत पाटील यांनी महामानवांनी जे कार्य स्वतः च्या पैशातून उभे केले त्यास चंद्रकांत पाटील हे भीक म्हणत असतील तर त्यांच्या मेंदूत निश्चितपणे घोळ आहे, असेच म्हणावे लागेल.

COMMENTS