Homeताज्या बातम्यासंपादकीय

लोकलचा जीवघेणा प्रवास

मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जात असलेली लोकल रेल्वे सेवा अजूनही कात टाकण्याची चिन्हे दिसून येत नाही. सकाळ झाली की, लाखो प्रवासी जीव मुठीत घे

समान नागरी कायद्याच्या दिशेने…
जागावाटपाचा गुंता
मराठीचा ‘अभिजात’ दर्जा कुठे अडकला ?

मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जात असलेली लोकल रेल्वे सेवा अजूनही कात टाकण्याची चिन्हे दिसून येत नाही. सकाळ झाली की, लाखो प्रवासी जीव मुठीत घेवून लोकल रेल्वेचा प्रवास करत असतात. गेल्या 5 दिवसांमध्ये 3 प्रवाशांचा मृत्यू झाल्यामुळे लोकलचा प्रवास किती जीवघेणा झाला, याकडे लक्ष वेधण्याची गरज आहे. मुंबईची ही आजची परिस्थिती नसून, अनेक दशकांपासून मुंबईची ही परिस्थिती कायम आहे. या प्रश्‍नांवर रेल्वे प्रशासन आणि सरकार कोणताही तोडगा काढू शकलेले नाही. मेट्रोच्या प्रवासामुळे ही गर्दी कमी होईल अशी अपेक्षा होती, मात्र वाढत्या लोकसंख्येमुळे लोकल रेल्व सेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे. वास्तविक पाहता मुंबईसारख्या शहरांमध्ये अनेकांना घरे घेणे परवडत नाही. तर अनेकजण केवळ रोजगारासाठी मुंबईत येतात. अशावेळी मुंबईच्या एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत पोहचण्यासाठी चाकरमानी दरररोज लोकलचा प्रवास करण्याला प्राधान्य देतात. त्यामुळे लोकलला मुंबईची लाईफलाईन म्हणतात. दररोज कोट्यावधी प्रवासी लोकलने प्रवास करत आहेत. मात्र दररोज लोकल आली की हजारो प्रवाशी आतमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी तुटून पडतात. अनेकांना आतमध्ये प्रवेश मिळतो, तर अनेकजण काहीतरी पकडून उभ्यानेच प्रवास करतात तर अनेकजण लटकून प्रवास करतात. ही गर्दी केवळ एका दिवसांची नसून नित्याचीच झाली आहे. त्यातच गेल्या 3 तब्बल 139 लोकांचा ट्रेनमधून पडून मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या नसतील तर नवलच. कारण 90 दिवसांमध्ये 139 प्रवाशांचा मृत्यू होण्याची संख्या कमी नाही. एवढ्या मोठ्या संख्येचे मृत्यू होवून देखील रेल्वे प्रशासन कोणत्याही तातडीच्या उपाययोजना करतांना दिसून येत नाही. अन्यथा या पाच दिवसांत तिघांचा मृत्यू झालाच नसता.

वास्तविक पाहता लोकलचा जीवघेणा प्रवास वाढण्यामागची कारणे समजून घेण्याची खरी गरज आहे. मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यासारख्या जिल्ह्यात रोजगारांसाठी लाखो लोक या शहरात दाखल होतात. अशावेळी या लोकसंख्येला सामावून घेण्यासाठी आपण कोणतीही उपाययोजना अद्याप केलेली नाही. या वाढत्या लोकसंख्येसाठी ज्याप्रमाणे, पाणी, घरांची सुविधा, मूलभूत सोयी-सुविधांसोबत प्रवासाची सुविधा देखील लागते. मात्र वाढत्या लोकसंख्येला वाहतुकीची सुविधा पुरवण्यास लोकल कमी पडतांना दिसून येत आहे. त्याचाच परिणाम या सेवेवर होतांना दिसून येत आहे. त्यामुळेच मुंबईकरांची लाईफलाईन समजली जाणारी मुंबई लोकल अनेकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरत आहे. रेल्वे प्रशासनाने अपघाती मृत्यू कमी करण्यासाठी मध्य रेल्वे, पश्‍चिम रेल्वे, रेल्वे पोलिस, रेल्वे सुरक्षा बल, मुंबई रेल्वे विकास महामंडळ यंत्रणांनी एकत्र येत प्रयत्न केले असले तरी ते अपुरे ठरतांना दिसून येत आहे. त्यासाठी रेल्वेची संख्या वाढवण्याची खरी गरज आहे. कल्याण ते ठाणे दरम्यान वर्दळ मोठ्या प्रमाणावर असते. त्यातच डोंबवली रेल्वे स्टेशन अतीगर्दीचे म्हणून प्रसिद्ध आहे. अशावेळी  मुंबईची लाईफलाईन ठरलेली लोकल सेवा मुंबईकरांसाठी असुरक्षित ठरू लागली आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या जीवनवाहिनीला आता मृत्यूवाहिनी का म्हणू नये, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. यातील बहुतांश अपघात प्रवाशांच्या निष्काळजीपणामुळे होतांना दिसून येत आहे. मात्र त्यासोबतच पर्याय देखील असायला हवा तो उपलब्ध होत नसल्यानेच प्रवाशी असा जीवघेणा प्रवास करतांना दिसून येत आहे. त्यामुळे दिवसेंदवस वाढणारी गर्दी पाहता लोकलच्या फेर्‍या वाढवण्याची मागणी होत आहे. एसी लोकलमुळे लोकलच्या फेर्‍या कमी झाल्याचा आरोप देखील प्रवाशांकडून करण्यात येत आहे. कल्याण, डोंबीवलीहून मुंबईला नोकरीसाठी येणार्‍या संख्या जास्त आहे. अशावेळेस लोकलची संख्या कमी पडत असल्यामुळे प्रवाशांकडून जीवघेणा प्रवास केला जातो. त्यामुळे या जीवघेण्या प्रवासाला ज्याप्रमाणे प्रवासी जबाबदार आहे, त्याचप्रमाणे रेल्वे प्रशासन देखील तितकेच जबाबदार आहे. 

COMMENTS