आधुनिक भारताच्या विकासात शेती हाच पाया; वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. डॉ. इंद्रमणी यांचे जिरेवाडीत प्रतिपादन परळी: वसं

आधुनिक भारताच्या विकासात शेती हाच पाया; वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. डॉ. इंद्रमणी यांचे जिरेवाडीत प्रतिपादन
परळी: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीचे कुलगुरू प्रो. डॉ. इंद्रमणी यांनी आधुनिक भारताच्या विकासात शेती क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, शेती हा प्रत्येक विकासाचा पाया आहे असे प्रतिपादन केले. २९ जुलै २०२६ रोजी शासकीय कृषी महाविद्यालय व शासकीय कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, जिरेवाडी येथे त्यांनी विद्यार्थी मार्गदर्शनपर भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना कृषी शिक्षण, संशोधन आणि कृषी व्यवसाय व्यवस्थापनाच्या संधींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
मार्गदर्शन करताना कुलगुरू प्रो. डॉ. इंद्रमणी म्हणाले की, भारत स्वतंत्र झाला तेव्हा देशातील शेती उत्पादन हे वाढत्या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अपुरे होते. मात्र गेल्या सात दशकांत कृषी क्षेत्राने मोठी प्रगती केली असून, आज भारत १४० कोटी लोकांच्या अन्नाची गरज भागवण्याबरोबरच जगातील विविध देशांमध्ये कृषी उत्पादनांची निर्यात करत आहे. अन्नधान्य उत्पादनाच्या बाबतीत भारत जगातील प्रमुख कृषी राष्ट्रांपैकी एक बनला आहे.
या प्रगतीचे श्रेय कृषी क्षेत्रातील संशोधन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, भारतीय कृषी संशोधन परिषद तसेच देशातील कृषी विद्यापीठांच्या योगदानाला जाते, असे त्यांनी सांगितले. भारतीय कृषी शिक्षण व संशोधन क्षेत्रात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीने महत्त्वपूर्ण स्थान निर्माण केले असून हा दर्जा टिकवण्यासाठी विद्यापीठांतर्गत सर्व महाविद्यालयांनी शिक्षण व संशोधनामध्ये योगदान देणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
कृषी शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना कृषी व्यवसाय व व्यवस्थापनाचे ज्ञान देणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी जिरेवाडी येथे सन २०२४ मध्ये स्थापन झालेल्या कृषी व कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या स्थापनेचा इतिहास सांगितला. तत्कालीन कृषी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी महाविद्यालय स्थापनेसाठी केलेल्या प्रयत्नांचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. तसेच आपल्या चार वर्षांच्या कार्यकाळात विद्यापीठांतर्गत स्थापन झालेल्या नवीन कृषी महाविद्यालयांची माहितीही कुलगुरूंनी दिली.
गुरुपौर्णिमेच्या औचित्याने कुलगुरू प्रो. डॉ. इंद्रमणी यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. शैक्षणिक जीवनात गुरुचे स्थान किती महत्त्वाचे आहे, हे त्यांनी संत कबीर यांच्या दोह्यांच्या माध्यमातून स्पष्ट केले.
यावेळी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य डॉ. दिनेशसिंह चौहान, शिक्षण विभाग प्रमुख डॉ. विनोद शिंदे, डॉ. गणेश गायकवाड, वरिष्ठ लिपिक अनंत मुंडे, गोपाळ विघ्ने, प्रा. बाबासाहेब मस्के, प्रा. शिवाजी किर्जत, प्रा. इंगोले, ग्रंथपाल श्रीमती मोडके, सर्व कार्यालयीन कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS