जालना : तब्बल 318 वर्षांची अखंड परंपरा लाभलेल्या संत मुक्ताई पालखी सोहळ्यातील ऐतिहासिक रिंगण सोहळा रविवारी प्रथमच जालना शहरात पार पडला. या अभूतपू
जालना : तब्बल 318 वर्षांची अखंड परंपरा लाभलेल्या संत मुक्ताई पालखी सोहळ्यातील ऐतिहासिक रिंगण सोहळा रविवारी प्रथमच जालना शहरात पार पडला. या अभूतपूर्व धार्मिक सोहळ्यासाठी राज्याच्या विविध भागांतून हजारो वारकरी, भाविक आणि नागरिकांनी मोठ्या उत्साहाने उपस्थिती दर्शविली. भक्ती, श्रद्धा आणि वारकरी संस्कृतीचा संगम अनुभवण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
सकाळी साडेसात वाजता सुरू झालेल्या रिंगण सोहळ्याने संपूर्ण परिसर हरिनामाच्या गजराने दुमदुमून गेला. टाळ, मृदुंग आणि अभंगांच्या सुरांनी वातावरण भक्तिमय झाले होते. ज्ञानोबा-तुकाराम तसेच मुक्ताई माऊलीच्या जयघोषाने जालना नगरीत भक्तिरसाचा अनोखा आविष्कार पाहायला मिळाला. शनिवारी संत मुक्ताई पालखीचे शहरात आगमन झाल्यापासूनच वारकरी आणि नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. ऐतिहासिक रिंगण सोहळ्याचे प्रत्यक्ष साक्षीदार होण्यासाठी अनेक भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली होती. पालखीचे दर्शन घेण्यासाठी रस्त्यांच्या दुतर्फा भक्तांची रांग लागली होती. या सोहळ्यात विविध दिंड्या, फडकरी, महिला वारकरी आणि युवकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. पारंपरिक वेशभूषा, अखंड हरिपाठ, नामस्मरण आणि टाळ-मृदुंगाच्या गजरामुळे वारकरी परंपरेचे वैभव सर्वांसमोर उभे राहिले. समता, सेवा, भक्ती आणि बंधुभावाचा संदेश देणारी ही परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे कार्य या सोहळ्याने केले. रिंगण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सुरक्षेसह वाहतूक व्यवस्थापन, आरोग्य सुविधा आणि पिण्याच्या पाण्याची व्यापक व्यवस्था केली होती. विविध सामाजिक संस्था आणि स्वयंसेवकांनीही वारकर्यांच्या सेवेसाठी पुढाकार घेत आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे संपूर्ण सोहळा शिस्तबद्ध आणि शांततेत पार पडला. संत मुक्ताई पालखीच्या तीन शतकांहून अधिक काळाच्या इतिहासात प्रथमच जालन्यात आयोजित करण्यात आलेल्या या रिंगण सोहळ्याने वारकरी संप्रदायाच्या परंपरेत नवे पर्व जोडले आहे. हजारो भाविकांच्या उपस्थितीत साजरा झालेला हा सोहळा भक्ती, श्रद्धा आणि सांस्कृतिक एकात्मतेचे प्रतीक ठरला असून, जालना शहराच्या धार्मिक इतिहासातही त्याची सुवर्णाक्षरांनी नोंद होणार आहे.

COMMENTS