जळगाव : राज्यातील बहुचर्चित 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'तील तब्बल ८० लाख महिलांना अपात्र ठरवले गेले आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदच

जळगाव : राज्यातील बहुचर्चित ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’तील तब्बल ८० लाख महिलांना अपात्र ठरवले गेले आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) च्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी राज्य सरकारवर तीव्र आक्षेप घेतला आहे. “मोठमोठे टेंडर काढले जात आहेत, सत्ताधारी लोकांच्या परदेश वाऱ्या व्यवस्थित सुरू आहेत, जाहिरातींवर सर्रास पैसा खर्च केला जातोय; या सगळ्या गोष्टींसाठी सरकारकडे पैसे आहेत, मग लाडक्या बहिणींना मिळणारे १५०० रुपये सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात का खुपत आहेत?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.
याबाबत अधिक बोलताना रोहिणी खडसे म्हणाल्या की, २०२४ मध्ये निवडणुकांच्या तोंडावर सरकारने ही योजना आणली आणि सरसकट सर्व महिलांना लाभ मिळेल असे सांगितले होते. निवडणुकांमुळे सुमारे २.३४ कोटी ते २.४८ कोटी महिलांना लाभ दिला गेला. मात्र, निवडणुका संपताच २०२५ मध्ये सरकारने या योजनेतील लाभार्थ्यांची छाननी सुरू केली आणि वेगवेगळे निकष लावून जवळपास २६ लाख महिलांना अपात्र केले.
आता २०२६ मध्ये सरकारने ‘ई-केवायसी’ची (e-KYC) नवी अट घातली असून, यामुळे सुमारे ८० लाख नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. परिणामी, लाभार्थी महिलांची संख्या २.४८ कोटींवरून थेट १.६८ कोटींवर आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. “निवडणुका संपल्यामुळे लाडक्या बहिणींचे महत्त्व कमी झाले आहे का? सरकार ‘काम सरो आणि वैद्य मरो’ या भूमिकेतून वागत आहे का?” असा घणाघात करत त्यांनी वाढत्या महागाईच्या काळात महिलांची संख्या कमी करण्याच्या शासनाच्या धोरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

COMMENTS