भोकर : शिंगारवाडी (ता. भोकर) येथे ऐन मे महिन्यात स्थानिक प्रशासनाच्या गलथान व नियोजनशून्य कारभारामुळे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावाच्या ह

भोकर : शिंगारवाडी (ता. भोकर) येथे ऐन मे महिन्यात स्थानिक प्रशासनाच्या गलथान व नियोजनशून्य कारभारामुळे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावाच्या हाकेच्या अंतरावर पाणी प्रकल्प असूनही तसेच जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना कार्यान्वित असतानाही नागरिकांना तीव्र पाणीसंकटाचा सामना करावा लागत आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून गावातील पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित असून नागरिकांचे हाल होत आहेत. या गंभीर परिस्थितीकडे सरपंच व ग्रामसेवक यांचे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, तापमानाचा पारा 42 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने उष्माघाताचा धोका वाढला असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अशा परिस्थितीत आगीसारख्या घटना घडण्याची भीतीही व्यक्त होत आहे. नागरिक कुलरचा आधार घेऊन उष्णतेपासून बचाव करण्याचा प्रयत्न करत असले तरी पाणीपुरवठा बंद असल्याने पिण्याच्या पाण्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, अवघ्या एक किलोमीटर अंतरावर पाणी प्रकल्प उपलब्ध असूनही केवळ प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे व नियोजनाच्या अभावामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. तसेच, पाणीपुरवठा करणार्या कर्मचार्याच्या मनमानी कारभारामुळे पाणीपुरवठा अनियमित होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. संबंधित कर्मचार्याची तात्काळ बदली करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर कोणतीही अप्रिय घटना घडण्यापूर्वी सरपंच व ग्रामसेवक यांनी तात्काळ दखल घेऊन योग्य त्या उपाययोजना कराव्यात, तसेच वरिष्ठ अधिकार्यांनीही याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे; अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे.

COMMENTS