। प्रतिनिधीग्रामीण भागात प्रवास करणार्या एस.टी. प्रवाशांना योग्य ठिकाणी उतरणे व बसथांबा ओळखणे अधिक सुलभ व्हावे, या सामाजिक जाणिवेतून कडा येथील ग

। प्रतिनिधी
ग्रामीण भागात प्रवास करणार्या एस.टी. प्रवाशांना योग्य ठिकाणी उतरणे व बसथांबा ओळखणे अधिक सुलभ व्हावे, या सामाजिक जाणिवेतून कडा येथील ग्रामपंचायत सदस्य दत्ता होळकर यांनी गावांच्या नावाच्या पाट्या भेट देण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला आहे. त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
ग्रामीण भागातील अनेक बसथांब्यांवर गावांची नावे स्पष्टपणे दर्शविणार्या पाट्या नसल्यामुळे प्रवाशांना, विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला व बाहेरगावच्या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन दत्ता होळकर यांनी स्वतः पुढाकार घेत एस.टी. महामंडळाच्या ग्रामीण मार्गांवरील बससाठी गावांच्या नावाच्या पाट्या तयार करून त्या भेट दिल्या. या उपक्रमामुळे एस.टी. चालक व वाहतूक नियंत्रकांनाही गाव ओळखण्यास सुलभता मिळणार असून प्रवाशांचा वेळ व गैरसोय टळणार आहे. याप्रसंगी वाहतूक नियंत्रक विष्णु कळसाईत, गणेश काळे, सागर रावळ, नितीन मंजुळे यांच्यासह अनेक प्रवासी उपस्थित होते. उपस्थितांनी या उपक्रमाचे स्वागत करत दत्ता होळकर यांच्या सामाजिक जाणिवेचे विशेष कौतुक केले. यावेळी बोलताना वाहतूक नियंत्रक विष्णु कळसाईत म्हणाले, ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी अशा पाट्या अत्यंत उपयुक्त ठरणार असून एस.टी. सेवेची गुणवत्ता वाढविण्यास निश्चितच मदत होईल. दरम्यान, दत्ता होळकर यांनी सांगितले की, लोकप्रतिनिधी म्हणून समाजाच्या छोट्या-छोट्या अडचणी सोडविणे हीच खरी सेवा आहे. पुढील काळातही अशा उपयुक्त उपक्रमांसाठी प्रयत्नशील राहणार आहे. या सामाजिक उपक्रमामुळे ग्रामीण प्रवाशांच्या सोयीसाठी एक सकारात्मक पाऊल उचलले गेले असून, इतर लोकप्रतिनिधींनीही अशा उपक्रमांतून सामाजिक योगदान द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

COMMENTS