बियाण्यांची किंमत वाढवू नका ; कृषिमंत्र्यांचे महाबीजला आदेश

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बियाण्यांची किंमत वाढवू नका ; कृषिमंत्र्यांचे महाबीजला आदेश

यंदाच्या खरीप हंगामासाठी राज्यातील शेतकर्‍यांना सोयाबीनसह अन्य पिकांचे गुणवत्तापूर्ण बियाणे पुरविताना त्यांची किंमत वाढवू नका

आत्मा मालिक मध्ये साईच्या कुस्ती प्रशिक्षणासाठी खेळाडूंची भरती
आरक्षणाच्या पोकळ घोषणा नको, कृती करा; संभाजीराजे यांचा राज्य सरकारला इशारा
राम मुखेकर यांना कृषी उद्योजक पुरस्कार

मुंबई : यंदाच्या खरीप हंगामासाठी राज्यातील शेतकर्‍यांना सोयाबीनसह अन्य पिकांचे गुणवत्तापूर्ण बियाणे पुरविताना त्यांची किंमत वाढवू नका, असे निर्देश कृषिमंत्री दादा भुसे यांनी महाबीजला दिले. पालेभाज्यांच्या बियाणे निर्मितीमध्ये महाबीजने मार्गक्रमण करावे, अशी सूचना त्यांनी दिली. 

मंत्रालयात कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगामासाठी बियाणे नियोजनाची बैठक झाली. या वेळी कृषी सचिव एकनाथ डवले उपस्थित होते. राज्यात खरीप हंगामाचे एक कोटी 41 लाख 94 हजार हेक्टर क्षेत्र असून ज्वारी, बाजरी, भात, मका, तूर, मुग, उडीद, भुईमूग, सोयाबीन, कापूस ही प्रमुख पिके घेतली जातात. राज्यात 16 लाख 67 हजार क्विंटल बियाण्यांची गरज असून महाबीज, राष्ट्रीय बीज निगम आणि खासगी कंपन्या यांच्या माध्यमातून बियाण्यांचा पुरवठा केला जातो. राज्यामध्ये सोयाबीनचे क्षेत्र 42 लाख 22 हजार 165 हेक्टर आहे. त्यासाठी 31 लाख 66 हजार क्विंटल सोयाबीन बियाणांची आवश्यकता आहे. सोयाबीन बियाण्यांची कमतरता भासू नये, यासाठी राज्य शासनामार्फत शेतकर्‍यांना स्वत:कडील बियाणे वापरण्याबाबत आवाहन केले होते. त्याचा परिणाम म्हणून शेतकर्‍यांकडे स्वत:चे सुमारे 20 लाख क्विंटल बियाणे उपलब्ध असल्याचे कृषी विभागाच्या अधिकार्‍यांनी या वेळी सांगितले. भुसे यांनी या वेळी खरीप 2021 हंगामाचे नियोजन करताना हेक्टरी बियाण्यांची आवश्यकता तसेच बीज उत्पादक कंपन्यांनी केलेले नियोजन याबाबत आढावा घेतला. बियाणे विक्रीनंतर त्यासंदर्भात ट्रॅकींग यंत्रणा तयार करावी. त्यामध्ये पुरवठा, विक्री आणि उपलब्धता अशा प्रकारे बियाण्यांची माहिती उपलब्ध होईल, अशी यंत्रणा एक एप्रिलपर्यंत तयार करावी, असे निर्देश त्यांनी दिले. सोयाबीनपाठोपाठ राज्यात कापसाचे क्षेत्रदेखील मोठ्या प्रमाणावर असून सुमारे 42 लाख हेक्टर क्षेत्रावर कापूस घेतला जातो. राज्यामध्ये सध्या एक कोटी 60 लाख पाकीट बीटी कापूस बियाणे उपलब्ध असल्याचे या वेळी सांगण्यात आले. पारंपरिक बियाण्यांसोबतच भाजीपाल्याच्या वाणाकडे महाबीजने लक्ष द्यावे. पालेभाज्या बियाणे निर्मितीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर हाती घ्यावा. त्यासाठी कृषी विद्यापीठांच्या बीज गुणन केंद्र आणि रोपवाटिकांच्या जागांचा वापर करावा, असे निर्देशही भुसे यांनी दिले. गेल्या वर्षी सोयाबीन बियाण्यांबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यातून बोध घेऊन या वर्षी बियाण्यांच्या उगवण क्षमतेबाबत तक्रार येणार नाही. बियाण्यांची कमतरता न भासता वाजवी दरात ते शेतकर्‍याला मिळेल, यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.

COMMENTS