नगर शहराला मुळा धरणातून नेमके किती पाणी येते व मनपाद्वारे शहरातील नागरिकांना किती पाणी वितरित होते, याची खानेसुमारी महापालिकेने सुरू केली आहे.
अहमदनगर/प्रतिनिधी- नगर शहराला मुळा धरणातून नेमके किती पाणी येते व मनपाद्वारे शहरातील नागरिकांना किती पाणी वितरित होते, याची खानेसुमारी महापालिकेने सुरू केली आहे. यासाठी पुण्याच्या संस्थेची नियुक्ती केली गेली आहे. दरम्यान, स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले व मनपा आयुक्त शंकर गोरे यांनी नगरच्या पाणी योजनेची पाहणी नुकतीच केली.
नगर शहरात मागील काही दिवसांपासून पाणी टंचाईची स्थिती काही भागात जाणवत आहे. मुळा धरणात मुबलक पाणी असूनही शहरातील काही भागात कमी दाबाने पाणी येते. यामुळे नगरसेवकांकडून पाणीपुरवठ्याच्या तक्रारी महापालिकेकडे होत आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्त शंकर गोरे यांनी मुळा धरणातून नगर शहराला नेमके किती पाणी येते, विळद जलशुद्धीकरण केंद्रात किती पाणी शुद्ध होते व तेथून ते नागापूर उपकेंद्रात किती येते आणि मग वसंत टेकडी येथील मुख्य टाकीत किती पाणी येते याची माहिती घेण्याचे काम त्यांनी सुरू केले आहे. वसंत टेकडी टाकीत येणार्या पाण्याचे वितरण शहरभर असलेल्या उंच टाक्यांद्वारे कसे होते, याचीही माहिती त्यांनी मागवली आहे. या पार्श्वभूमीवर अहमदनगर महापालिकेच्या वतीने पाणीपातळी मोजण्याचे काम हाती घेतले असून पुणे येथील एजन्सीमार्फत मुळा धरणातून पाण्याचा होणारा उपसा व याचबरोबर विळद व वसंत टेकडी येथील पाण्याच्या पातळीची तपासणी करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
COMMENTS