ठाणे-बोरिवली भुयारी मार्ग अनिश्‍चिततेच्या गर्तेत

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ठाणे-बोरिवली भुयारी मार्ग अनिश्‍चिततेच्या गर्तेत

मुंबईकरांचा बोरिवली ते ठाणे हा दीड तासांचा प्रवास 15 मिनिटांत पूर्ण करण्यासाठी आराखडा आखलेला बोरिवली-ठाणे भुयारी महामार्ग अनिश्‍चिततेच्या गर्तेत सापडला आहे.

केंद्राकडून अगोदर मदत आणि नंतर लूट ; शेतकर्‍यांच्या संतप्त भावना; रासायनिक खतांच्या किंमतीत वाढ
नेपाळमधील अपघातात 6 भारतीयांचा मृत्यू
नातवानेच केली आजीची हत्या

 मुंबई/प्रतिनिधी : मुंबईकरांचा बोरिवली ते ठाणे हा दीड तासांचा प्रवास 15 मिनिटांत पूर्ण करण्यासाठी आराखडा आखलेला बोरिवली-ठाणे भुयारी महामार्ग अनिश्‍चिततेच्या गर्तेत सापडला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने वेळखाऊ धोरण अवलंबल्याने या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे असलेला हा प्रकल्प बाजूला पडल्याने मुंबईकरांच्या ’15 मिनिटांचे स्वप्न’ भंगणार असल्याचे स्पष्ट होत आहे. 

टिकुजीनी वाडीपासून बोरिवलीपर्यंत वाहतुकीसाठी 11 किलोमीटरचा भुयारी मार्ग बांधण्याचा प्रस्ताव 2015 मध्ये तयार केला. विस्तृत प्रकल्प अहवालही तयार करण्यात आला. प्रकल्पामुळे राष्ट्रीय उद्यानाला धक्का पोहोचू नये, यासाठी मेट्रो भुयारी कामांसाठी वापरण्यात येणार्‍या टनेल बोअरिंगने हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. ही सगळी तयारी झालेली असताना नेमक्या कोणत्या कारणांमुळे हा प्रकल्प अडला आहे, याचे उत्तर देण्यास कोणतीही यंत्रणा तयार नाही. घोडबंदर रोड गुजरातच्या दिशेने जात असल्याने रात्रीच्या वेळी येथे अतिप्रचंड वाहतूक कोंडी असते. भुयारी रस्ते प्रकल्पामुळे बोरिवली-ठाणे दरम्यान ’फाऊंटनचा’ वळसा वाचेल. हजारो वाहनांच्या लाखो लिटर इंधनात बचत होईल आणि पर्यावरण संवर्धनालादेखील मदत होईल. मुंबईतील जागांचे भाव आवाक्याबाहेर गेल्याने ठाणे-बोरिवली पट्ट्यात विशेषत: घोडबंदर रोडला गेल्या काही वर्षांत मोठी मागणी आहे. यामुळे घोडबंदर रोडवरील संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी भुयारी मार्ग बनविण्याचा निर्णय झाला. तीन मार्गिकांचे प्रत्येकी दोन बोगदे आणि स्वतंत्र लिंक रोड असे या प्रकल्पाचे वैशिष्ट्य आहे. याबाबत एमएसआरडीसी यांच्याशी संपर्क साधला असता, ’हा प्रकल्प आता एमएमआरडीएकडे आहे. त्यामुळे त्यांच्या प्रकल्पाबाबत आम्ही बोलणे योग्य ठरणार नाही, असे सांगण्यात आले. या प्रकल्पाचा आढावा घेतला जात असल्याचे एमएमआरडीएचे म्हणणे आहे. सप्टेंबर, 2020मध्ये एमएमआरडीएकडे हा प्रकल्प आला, तेव्हा प्रकल्प खर्च नऊ हजार कोटी इतका होता. सध्या वाढीव प्रकल्प खर्चाबाबत एमएमआरडीएकडून सांगण्यात आलेले नसले, तरी प्रकल्प खर्चात अंदाजे दोन हजार कोटी वाढण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात आली आहे. एमएमआरडीएतील सर्व प्रकल्पांचा आढावा घेण्यात येत आहे. मेट्रो प्रकल्पांचा आढावा सध्या सुरू आहे. दोन-तीन दिवसांत बोरिवली-ठाणे भुयारी मार्ग प्रकल्पाचादेखील आढावा घेण्यात येईल.

COMMENTS