काहींना वाटले भाजपत गेले की मंत्रिपदे मिळतात.
अहमदनगर/प्रतिनिधी: काहींना वाटले भाजपत गेले की मंत्रिपदे मिळतात. डावपेच करायला जातात आणि तेच फसतात. काँग्रेस सोडणार्यांवर आता पायरीवर उभे राहायची वेळ आली आहे, अशी टीका महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राधाकृष्ण विखे यांचा नामोल्लेख टाळून केली.
अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसची संघटनात्मक आढावा बैठक थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज पक्ष कार्यालयात पार पडली. या वेळी ते बोलत होते. थोरात म्हणाले, की कठीण काळातही आम्ही काँग्रेस सोडली नाही, म्हणून आज माझ्याकडे मंत्रिपद आहे. आपण विचारांवर ठाम राहिले पाहिजे. विरोधकांनी काँग्रेस सोडली अन् त्यांच्यावर पायरीवर उभी राहण्याची वेळ आली. डावपेच करत असताना स्वत:च फसतात. राज्यातील सरकार पाच वर्षे टिकणार आहे. भाजप समाजात दुही माजवण्याचा प्रयत्न करीत आहे. भारतात धर्माधर्मात भांडणे लावून देश रसातळाला नेण्याचे काम सुरू आहे. नोटाबंदी, जीएसटी, पेट्रोल दरवाढीने अर्थव्यवस्थेची वाट लागली आहे. एक रुपयाने पेट्रोल वाढले तरी आंदोलन करणारे भाजपवाले आज गप्प आहेत? कृषीच्या कायद्याने महागाई वाढणार आहे.
COMMENTS