काँग्रेसला संधी….पण?

Homeताज्या बातम्यासंपादकीय

काँग्रेसला संधी….पण?

भारतीय राजकारणात सर्वात जुना आणि ऐतिहासीक राजकीय पक्ष म्हणून भलावणा होत असलेल्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षासाठी मंगळवार क्रांतीकारी दिवस ठरला. शहीद भगत

काँग्रेसची अवस्था म्हणजे हवेली सांभाळता न येणाऱ्या जमीनदारासारखी-पवार
काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली
काँगे्रसचे बुडते जहाज


भारतीय राजकारणात सर्वात जुना आणि ऐतिहासीक राजकीय पक्ष म्हणून भलावणा होत असलेल्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षासाठी मंगळवार क्रांतीकारी दिवस ठरला. शहीद भगतसिंग यांच्या जयंती दिवशी डाव्या विचारसरणीचे तरूण नेतृत्व पक्षात दाखल होणे आणि इकडे पक्षप्रवेशाचे सोहळा गीताची धुन वाजत असतानाच तिकडे पंजाबमध्ये प्रदेशाध्यक्ष  नवज्योत सिध्दूसह नव्याने स्थापन झालेल्या चेन्नी मंत्रीमंडळातील दोन मंत्र्यांनी राजीनामा देणे या दोन्ही घटना काँग्रेसच्या भविष्यकालीन राजकीय प्रवासासाठी क्रांतीकारी ठरणाऱ्या आहेत. मात्र या दोन्ही घटनांचा अर्थ,अनर्थ आणि अन्वयार्थ समजून पक्ष नेतृत्वाने पाऊले टाकण्याची आवश्यकता आहे
.

राजकारणात आवक जावक सुरू असते. राजकारण प्रक्रीयेतील तो एक अविभाज्य भाग आहे,फक्त वैचारीक अधिष्ठान सोडून झालेली आवक आयातदाराला कितपत पेलेल यावर त्या राजकीय पक्षाच्या भवितव्याची वाटचाल अवलंबून असते. गेल्या पाच सात वर्षात भारतीय राजकारणात आयाराम गयाराम संस्कृतीने वैचारिक अधिष्ठान पोखरल्याने तत्वनिष्ठ राजकारणाची वाताहात झाल्याचे पहायला मिळते. जिकडे सत्ता तिकडे उड्या मारण्याची सत्ता लोलूपता भारतीय राजकारणावर हावी झाल्याने नव्याने सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्षात येणाऱ्यांची गर्दी वाढली,यात वर्षानूवर्षे सत्तेची उब चाखणाऱ्या  काँग्रेसी मंडळींचा भरणा अधिक असणे स्वाभाविक होते. त्याचा परिणाम काँग्रेस खिळखिळी होण्यात झाला,राष्ट्रीय आणि प्रादेशिक पातळीवर वर्चस्व असलेल्या काँग्रेसची बडी मंडळी घाऊकपणे भाजपात प्रवेशीत झाली. यातून काँग्रेसमुक्त भारात या भाजपच्या मोहीमेलाही जोर मिळाला. ही बाब खरी असली तरी कुठलीही सुज संसर्गाचा परिणाम कमी होऊ लागला की ओसरायला सुरूवात होते.भाजपमध्येही सत्तेच्या संसर्गामुळे आयाराम मंडळींच्या येण्यामुळे आलेली सुज आता हळूहळू ओसरू लागल्याचे दिसत आहे. भाजपमध्ये गेलेल्या अनेक मंडळींना घरा वापसीचे वेध लागले आहेत. यापैकी अनेकांनी आपल्या हातानेच परतीचे दोर कापून टाकल्याने घरवापसी अवघड असली तरी काही समविचारी पक्षांमधून तरूण नेतृत्व काँग्रेस सारख्या पक्षाची निवड करू लागल्याचे काँग्रेससाठी सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे चित्र आहे. त्याचा प्रत्यय मंगळवारी कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवाणीच्या पक्ष प्रवेशाने आला देखील. अर्थात या पक्ष प्रवेशामुळे पक्षाला आणि त्या दोन्ही तरूण नेत्यांना किती फायदा होईल याचे उत्तर उद्याच्या राजकीय वाटचालीवर अवलंबून असले तरी राजकारणाचे वारे उलट्या दिशेने वाहू लागलेत हे मात्र नक्की. कन्हैय्या कुमार आणि जिग्नेश मेवाणी यांनी काँग्रेसची  भारतीय राजकारणातील अपरिहार्यता स्वीकारली.हार्दिक पटेल यापुर्वीच काँग्रेसवासी झाले आहेत. याचाच अर्थ राजकारणातील नवी पिढी काँग्रेसच्या विचारसरणीला निश्चितच बळ देण्याचा विचार घेऊन पुढे जात आहे.हे तिनही तरूण नेते भारतीय राजकारणात तरूणांचे दीपस्तंभ आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. जिग्नेश मेवाणी कट्टर आंबेडकरवादी म्हणून भारतीय राजकारणात उदयाला आलेले नेतृत्व आहे, तर कन्हैय्या कुमार कट्टर डाव्या विचारसरणीचे. या दोन्ही विचारसरणी तशा काँग्रेसच्या मित्र विचारसरणी आहेत.म्हणून त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करणे वैचारीक अधिष्ठानाशी प्रतारणा केली असे अजिबात म्हणता येणार नाही. काँग्रेस हा खरा लोकशाही वादी पक्ष आहे म्हणून भारताची लोकशाही वाचविण्यासाठी काँग्रेस वाचविण्याचे महत्व विषद करून कन्हैय्याने काँग्रेसचा तिरंगा पटका गळ्यात घातला.हा तरूणाईला मोठा संदेश आहे.

कन्हैया कुमार यांच्या प्रवेशानं काँग्रेसला बळकटी मिळेल. मात्र त्यासाठी पक्षातील प्रस्थापीत खुंटांनी नव्या रक्ताच्या नेतृत्वाला वाव देण्याचा मोठेपणा दाखवायला हवा. पक्षनेतृत्वाने झापडे लावून निर्णय न घेता वंदता आहे त्याप्रमाणे पक्षात लोकशाही आणखी बळकट करण्याच्या दृष्टीने निर्णय घ्यायला हवेत. गयाराम संस्कृतीचा विशेषविचार न करता आहे त्यांना सोबत घेऊन पक्ष विस्ताराला प्रोत्साहन द्यायला हवे.धमक्यांना भिक घालून पक्ष नेतृत्वानेच नांगी टाकली तर जे पंजाबमध्ये घडत आहे त्याचीच पुनरावृत्ती देशपातळीवर वारंवार घडत राहील. खरेतर पंजाबमध्ये सिध्दूच्या आहारी गेल्यामुळे त्या राज्यात पक्का असलेला खुंटा पक्षनेतृत्वाने खिळखिळा केला आहे.अस्थिर असलेल्या सिध्दूच्या पिलावळीवर विसंबून दिर्घकाळ राजकारण करता येणार नाही,विशेषतः भाजपसारखा आक्रमक विरोधक सशक्त असतांना राजकारणाचा हा पोरखेळ थांबवला तरच कन्हैय्याकुमार यांच्या सारख्या नृव्या दम्याच्या कार्यकर्त्यांची पक्षातील भरती कामी येणार आहे. अन्यथा खोगीर म्हणून ही भरतीही निष्क्रीय ठरेल.

COMMENTS